साऊथम्पटन: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ११७ दिवस स्थगित असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुधवारपासून सुरू झाले. जैवसुरक्षित स्टेडियमवर कसोटीत चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंड संघाची लढत आठव्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजशी आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या.कोरोनाचा धोका लक्षात घेत आयसीसीने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रेक्षकांविना मालिका खेळवली जात आहे. कोरोनामुळे नवे नियमही लागू करण्यात आले आहेत.पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात एकाही चेंडूचा खेळ होण्याआधीच उपाहाराची विश्रांती घेण्यात आली. सुरुवातीला पावसाच्या सरी आणि परिणामी ओल्या असलेल्या आऊटफिल्डमुळे नाईलाजाने खेळाडूंना ‘लंच ब्रेक’ घ्यावा लागला. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरू होणार होता, पण हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींमुळे नाणेफेकही लांबणीवर पडली. अखेर तीन तास विलंबाने खेळ सुरु झाला. इंग्लंडने या सामन्यातून स्टुअर्ट ब्रॉड याला बाहेर ठेवले असून विंडीज संघात रहकीम कॉर्नवाल याला स्थान मिळू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सुमारे चार महिन्यानंतर पुनरागमन होत आहे. त्या अनुषंगाने अनेक सोईसुविधा करण्यात आल्या आहेत. पण त्याचसोबत निसर्गाची साथ हादेखील या सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणार आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या दिवशी पावसाचे विघ्न
वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या दिवशी पावसाचे विघ्न
वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 02:51 IST