भारतात आयपीएल फायनलचा गाजावाजा सुरु असताना तिकडे इंग्लंडमध्ये आश्चर्यकारक घटना घडली आहे. इंग्लंडमध्येही आज वेस्ट इंडिजसोबत तिसरा एक दिवशीय सामना खेळविला जात आहे. या सामन्यासाठी स्टेडिअमकडे दोन्ही संघ निघाले असताना एक विचित्र आणि हास्यास्पद घटना घडली आहे. यामुळे वेस्ट इंडिज संघ उशिराने मैदानावर पोहोचला आहे.
ओव्हलवर हा सामना होत आहे. वेस्ट इंडिजने बातमी लिहिस्तोवर तीन गडी गमावून ३२ रन्स केले आहेत. परंतू, त्यापूर्वी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ स्टेडिअमकडे जाणारे रस्ते काही कारणास्तव बंद असल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत सापडले होते. यावर उपाय काढत इंग्लंडच्या संघाने सायकलवरून स्टेडिअम गाठले, तर वेस्ट इंडिज संघाकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना तसेच बसमध्ये बसून वाहतुकीची कोंडी सुटण्याची वाट पहावी लागली.
या नाट्यमय घडामोडीमुळे सामन्याच्या टॉसला विलंब झाला. क्रिकेट सामने वेळेवर सुरू न होण्याच्या विचित्र कारणांच्या यादीत आता या ही कारणाची एन्ट्री झाली आहे.
इंग्लंडचे खेळाडू सायकलवरून ओव्हलच्या मैदानावर जाताना दिसले. इंग्लंडचे खेळाडू ओव्हलमध्ये सराव करताना देखील दिसले परंतू वेस्ट इंडिजची रुम मात्र रिकामीच होती. यात पाहुण्या संघाची चूक नव्हती, तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी लंडनमधील प्रचंड वाहतूक कोंडी त्यांच्या उशिरा पोहोचण्याचे कारण ठरली होती. या विलंबामुळे टॉस अर्धा तास उशिराने झाला. सहाजिकच सामन्यालाही उशिरानेच सुरुवात झाली.
पहिल्या सामन्यात इंग्लंडने ४०० धावा ठोकल्या होत्या, त्याला प्रत्यूत्तर देताना वेस्ट इंडिजला १६२ धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने ३०८ धावा केल्या होत्या. इंग्लंडने ७ विकेट गमावत ३१२ धावा केल्या व सलग दुसरा सामना जिंकत चषकही जिंकला आहे.