Sunil Gavaskar On Rishabh Pant Century : इंग्लंडच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी रिषभ पंतच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. या खेळीसह तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा विकेट किपर बॅटर ठरला. पंतची ही खेळी त्याच्या अतरंगी अंदाजातील फटकेबाजीनं सजलेली होती. त्याच्या या क्लास खेळीवर भारताचे माजी कर्णधार आणि सध्याच्या घडीला समालोचन कक्षात दिसणाऱ्या लिटल मास्टर सुनील गावसकर यांची कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या गोड कमेंटला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिखट कमेंटच्या अगदी उलट असल्यामुळे गावसकरांचा कॉमेंट्री बॉक्समधील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतच्या शतकी खेळीवर नेमंक काय म्हणाले गावसकर?
लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रिषभ पंतनं शतक साजरे केल्यावर कोलांटी उडी मारत शतकी खेळीचा आनंद व्यक्त केला. यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्षा भोगले यांनी पंतचं कौतुक करताना आपल्या शेजारी बसलेल्या गावसकरांना त्याच्या खेळीबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारला. यावर गावसकरांनी Superb... Superb.. Superb! अशा शब्दांत भारतीय विकेट किपर बॅटरच्या खेळीचं कौतुक केले. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर अनेकांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्यांचे कटू बोलही आठवले आहेत.
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतवर संतापले होते गावसकर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुनील गावसकर यांनी रिषभ पंतच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करताना "स्टुपिड स्ट्युपिड स्टुपिड" असं म्हणत पंतला चांगलेच झाडले होते. बॉर्डर-गावकर ट्रॉफी स्पर्धेतील मेलबर्न कसोटी सामन्यात रिषभ पंत अगदी तोऱ्यात खेळत होता. पण मोक्याच्या क्षणी त्याने चुकीचा फटका खेळला अन् टीम इंडिया फसली. त्याने खेळलेला बेजबाबदार फटका पाहून गावसकर चांगलेच खवळले होते. त्यांनी पंतला स्टुपिड म्हटल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या कडू कमेंटनंतर आता गावसकरांची पंतसंदर्भातील गोड कमेंट चर्चेचा विषय ठरतीये.
पंतसह तिघांची शतके
रिषभ पंतनं हेडिंग्ले कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १३४ धावांची खेळी केली. त्याच्यासह शुबमन गिलनं केलेल्या १४७ धावा आणि पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालनं केलेल्या १०१ धावांसह लोकेश राहुलच्या ४२ धावांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत.