भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रख्यात क्रिकेट समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी बीसीसीआयच्या समालोचकांच्यां पॅनेलमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. शिवरामाकृष्णन यांनी ऐन आयपीएलच्या पूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच सलामीच्या लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमने सामने येणार आहेत.
लक्ष्मण शिवरामाकृष्ण यांनी बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनेलमधून निवृत्ती स्वीकारण्याच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त करताना या निर्णयामागचं कारणही सांगितलं आहे. तसेच बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी लिहिले की, मी आता बीसीसीआयसाठीच्या समालोचकांच्या टीममधून निवृत्ती स्वीकारत आहे. गेल्या २३ वर्षामध्ये मला नाणेफेक आणि प्रेझेंटेशनसाठी संधी देण्यात आली नाही. नवे लोक ही कामं करत आहेत. त्यामागे कारण काय असू शकतं, असा सवालही शिवरामाकृष्णन यांनी विचारला.
गेल्या काही वर्षांमध्ये नाणेफेक आणि सामन्यानंतर होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभामध्ये रवी शास्त्री आणि हर्षा भोगले यांना सातत्याने संधी मिळत आली आहे. तर शिवरामाकृष्णन यांना या जबाबदारीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली आहे. लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यात त्यांनी कसोटीमध्ये २६ आणि एकदिवसीय सामन्यात १५ बळी टिपले आहेत.