BCCI New Rules For IPL Celebration : आयपीएलच्या १८ व्या हंगामात विराट कोहलीच्या RCB संघानं १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिली वहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. ३ जूनला अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जच्या संघाला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ट्रॉफी उंचावल्यावर देशभरातील वेगवेगळ्या भागात RCB च्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ जून २०२५ रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सेलिब्रेशनचा बेत आखला गेला अन् चॅम्पियन्सला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी उसळली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ लोकांनी आपला जीव गमावल्याची दुर्देवी घटना घडली होती.
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय
बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील आनंदोत्सवाच्या क्षणी घडलेली दुर्घटनेमुळे RCB सह राज्यातील पोलिस प्रशासन आणि बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आता बीसीसीआयने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बीसीसीआयने विजयी सेलिब्रेशनसंदर्भात एक खास नियमावली तयारी केली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
काय म्हणाले बीसीसीआय सचिव?इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले आहेत की, बोर्ड या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. भविष्यात असा अनर्थ टाळण्यासाठी प्रत्येक पैलूकडे गांभीर्याने पाहत आहोत. यापुढे आयपीएलनंतर सार्वजनिकरित्या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व फ्रँयाचझी संघांना BCCI च्या नियमावलीचे पालन करणं बंधनकारक असेल.
विजयी जल्लोषाची तयारी करताना पाळावी लागणार बीसीसीआयची ही निमावली
- विजेतेपद पटकवल्यावर ३-४ दिवसांच्या आत कोणत्याही संघाला विजयी आनंदोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- घाईगडबड आणि खराब व्यवस्थापन टाळण्यासाठी आयोजित कार्यक्रमाताल तात्काळ परवानगी मिळणार नाही.
- आनंदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी फ्रँयाचझी संघांनी बीसीसीआयची औपचारिक परवानगी घ्यावी.
- बोर्डाच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
- कार्यक्रमाचे आयोजन करताना ४ ते ५-स्तरीय सुरक्षा प्रोटोकॉल अनिवार्य असेल
- सर्व ठिकाणी आणि प्रवासादरम्यान बहुस्तरीय सुरक्षा आवश्यक असेल.
- विमानतळापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणांपर्यंत सुरक्षा व्यवस्थ आवश्यक आहे.
- कार्यक्रमाच्या नियोजनात खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण सुनिश्चित करणे.
- जिल्हा पोलिस, राज्य सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक
- कायदेशीर आणि सुरक्षित आयोजनासाठी सर्व कार्यक्रमांना नागरी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांचा परवानाही आवश्यक राहिल