Join us

धवन, पुजाराची शतके! पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

आजपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू झालेल्य पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी फटकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 399 अशी भक्कम धावसंख्या उभारली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 17:57 IST

Open in App

गॉल, दि. 26 -  आजपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू झालेल्य पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी फटकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 399 अशी भक्कम धावसंख्या उभारली. आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर अभिनव मुकुंदच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. नुवान प्रदीपने मुकुंदला 12 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मात्र धवनने पुजाराच्या साथीने लंकेच्या गोलंदाजांना धुवून काढले.  शानदार शतकी खेळी करणाऱा धवन आणि पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागीदारी केली. जबरदस्त फटकेबाजी करत असलेल्या धवनचे द्विशतक दहा धावांनी हुकले. त्याला 190 धावांवर प्रदीपने बाद केले. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीच्या रूपात प्रदीपने भारताला तिसला धक्का दिला. त्यानंतर पुजाराने खेळपट्टीवर पाय रोवत श्रीलंकेला अधिक यश मिळवू दिले नाही. त्यादरम्यान त्याने आपले शतकही पूर्ण केले. पुजारा आणि रहाणेने चौऱ्या विकेटसाठी अभेद्य 113 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 399 धावांपर्यंत मजल मारून दिली. खेळ संपला तेव्हा  पुजारा  144 आणि रहाणे 39 धावांवर खेळत  होते. पहिल्या दिवशी श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने तीन बळी टिपले.  गॉलच्या या  मैदानावर भारताला दोन वर्षांपूर्वी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता; पण त्यानंतर भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखताना जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.विराट कोहली अँड कंपनी २०१५ मध्ये गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल. त्या वेळी चौथ्या दिवशी १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला होता.तेव्हापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे. युवा व आक्रमक कोहली आता परिपक्व झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६-१७च्या मोसमात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध १७ पैकी १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.