मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात सात वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर रंगलेला विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट रसिक विसरू शकत नाही. आज या विजयाला सात वर्ष पूर्ण होत असल्याने अनेकांकडून या अंतिम सामन्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. हा संपूर्ण सामना रंगतदार असला तरी भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे करणारा ठरणारा क्षण ठरला तो म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने खेचलेला विजयी षटकार.
शेवटच्या ११ चेंडूंमध्ये भारतीय संघाला चार धावांची गरज होती. नुवान कुलशेखरा गोलंदाजी करत होता. धोनी आणि युवराज क्रीझवर असले तरी सामना कोणत्याही बाजूला पलटेल, अशी धाकधुक सगळ्यांच्याच मनात होती. याचवेळी धोनीने नुवान कुलशेखराचा चेंडू डोळ्याचे पाते लवते न लवते तोच संपूर्ण ताकद लावून मैदानाबाहेर भिरकावून दिला. हा चेंडू हवेतून सीमापार जाईपर्यंत धोनीची आणि सर्व भारतीयांची नजर त्यावर अक्षरश: खिळून होती. त्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशाचं विश्वविजयाचं स्वप्न साकार झालं होतं. देशभरात दिवाळी साजरी झाली होती.