Join us  

Chetan Chauhan : सुनील गावस्कर यांच्यासाठी चेतन चौहान यांनी पुकारलं होतं 'बंड'!

सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांची जोडी चांगलीच जमलेली... गावस्कर यांच्यासाठी एकदा चौहान यांनी बंड पुकारलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 6:56 PM

Open in App

भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चेतन चौहान  यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे  निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी दिली. किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.  मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांची जोडी चांगलीच जमलेली... गावस्कर यांच्यासाठी एकदा चौहान यांनी बंड पुकारलं होतं. ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

जुलै महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर नसलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.  ( Former India cricketer Chetan Chauhan has died)

1981मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला आणि त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. 1981मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.  2001 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. जून 2016 ते जून 2017 या कालावधीत ते National Institute of Fashion Technologyच्या चेअरमनपदावर होते. त्यांनी उत्तर प्रदेश येथील अमरोह येथून 1991 व 1998 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. ऑगस्ट 2018मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांना युवा व क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं.  

नेमकं काय झालं होतं? 

डेनीस लिली आणि सुनील गावस्कर हे त्यांच्या काळातील यशस्वी खेळाडू, परंतु एका वादाशी या दोघांचं नातं जोडलं गेलं. 1981मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता आणि तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 अशी पिछाडीवर होती. तिसरा सामना मेलबर्न येथे होणार होता. त्या मालिकेत गावस्कर यांची बॅट फार काही चालली नव्हती. ही मालिका पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे अधिक लक्षात राहिली. रेक्स व्हाईटहेड यांनी या मालिकेतून पंच म्हणून पदार्पण केलं होतं आणि तीनही सामन्यांत ते पंच होते. त्यांनी दिलेले सात निर्णय भारताच्या विरोधात होते. 

मेलबर्नवरील सामन्यात गावस्कर यांना सूर गवसला आणि त्यांनी चौहान यांच्यासोबत 165 धावांची सलामी दिली. 70 धावांवर असताना गावस्कर यांना लिली यांनी पायचीत केलं. चेंडू पॅडला लागला त्यात काहीच शंका नव्हती, परंतु त्यानं बॅटची कड घेतली होती. तरीही व्हाईटहेड यांनी गावस्कर यांना बाद दिले. त्यांच्या या निर्णयावर गावस्कर नाराज झाले आणि बराच काळ खेळपट्टीवरच उभे राहीले. पण, काही वेळानंतर गावस्कर पेव्हेलियनच्या दिशेनं जाऊ लागले तेव्हा लिली यांनी त्यांना डिवचले. तसेच ते माघारी फिरले आणि चौहान यांना सोबत येण्यास सांगितले. चौहानही त्यांच्याबरोबर निघाले, सीमारेषेनजीक येईपर्यंत सहाय्यक मॅनेजर बापू नाडकर्णी आणि मॅनेजर शाहीद दुरानी धावत मैदानावर आले. त्यांनी चौहान यांना माघारी जाण्यास सांगितले. त्यानंतर चौहान एकाग्रता हरवले आणि 85 धावांवर माघारी फिरले.  

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ