२०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. बुमराहने केवळ भारताला विजय मिळवून दिला नाही, तर क्रिकेटचे दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रमही मोडीत काढला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात बुमराहने आपल्या गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेऊन कीवी संघाचे कंबरडे मोडले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावी म्हणून गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, २०२४ च्या विश्वचषकातही त्याला 'मालिकावीर' म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
बुमराहने या सामन्यात घेतलेल्या ४ विकेट्समुळे त्याने आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. बुमराहने आता १६ विकेट्ससह आर. अश्विनची बरोबरी केली असून सचिन तेंडुलकर (१५ विकेट्स) याला मागे सोडले आहे.
आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स:
१)मोहम्मद शमी - २२
२) झहीर खान - १७
३) जसप्रीत बुमराह - १६
४) रविचंद्रन अश्विन - १६
५) सचिन तेंडुलकर - १५
६) रवींद्र जडेजा - १५
आता शमीचा विक्रम निशाण्यावर
सध्या ३२ वर्षांचा असलेला जसप्रीत बुमराह आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ज्या प्रकारे तो सध्या फॉर्मात आहे, ते पाहता आगामी आयसीसी स्पर्धांमध्ये तो मोहम्मद शमीचा २२ विकेट्सचा विक्रमही लवकरच मोडीत काढण्याची शक्यता आहे. जर बुमराहने हे यश मिळवले, तर तो आयसीसी बाद फेरीतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.