Join us  

Breaking : टीम इंडियाच्या निवड समितीचे नवीन अध्यक्ष ठरले, द. आफ्रिका मालिकेसाठी निवडणार संघ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीमधील दोन पदांसाठी तीन व्यक्तींच्या बुधवारी मुलाखती घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:06 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीमधील दोन पदांसाठी तीन व्यक्तींच्या बुधवारी मुलाखती घेतल्या. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, फिरकीपटू सुनील जोशी आणि समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचा समावेश होता. तसेच राजेश चौहान व हरविंदर सिंग यांनाही मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. मुलाखतीचे सत्र संपल्यानंतर सीएसीनं टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखाच्या नावाची घोषणा केली. 

बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून या मुलाखतींना सुरुवात झाली. दोन पदांसाठी तब्बल 44 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही समावेश होता. निवड समितीसाठी त्याला प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र त्याला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले नाही. तसेच माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानेही या पदासाठी अर्ज भरला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आगरकरच्या अर्जावरही विचार झाला, मात्र अखेर सीएसीने शिवा, प्रसाद, चौहान, जोशी आणि हरविंदर यांना बोलाविण्याचा निर्णय घेतला.''

बीसीसीआयनं सुनील जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. एमएसके प्रसाद यांच्यानंतर आता सुनील जोशी यांच्याकडे टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद असणार आहे. निवड समितीमध्ये हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.  मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

निवड समिती - देवांग गांधी, जतीन परांजपे, सरणदीप सिंग, सुनील जोशी आणि हरविंदर सिंग

कोण आहेत सुनील जोशी?कर्नाटकचे सुनील जोशी हे टीम इंडियाचे माजी फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे 15 कसोटी आणि 69 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. 15 कसोटीत त्यांनी 41, तर 69 वन डे सामन्यांत 69 विकेट्स घेतल्या आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांच्या नावावर प्रत्येकी एक अर्धशतकही आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1999 मध्ये त्यांनी 6 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि ती त्यांच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय