Join us  

विराट कोहलीला मोठा धक्का; रोहितची मात्र 'चांदी'

भारताच्या विराट कोहलीला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर रोहितची मात्र 'चांदी' झाल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:39 PM

Open in App

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवला. त्यानंतर भारताच्या विराट कोहलीला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर रोहितची मात्र 'चांदी' झाल्याचे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे ( 3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. टीम इंडियानं या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. दीपक चहरनं हॅटट्रिक घेत ट्वेंटी-20त प्रथमच पाच विकेट घेतल्या.

या मालिका विजयानंतर आयसीसीने ट्वेन्टी-२० क्रिकेटची क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीमध्ये भारताच्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. पण दुसरीकडे मात्र कोहली अव्वल दहा फलंदाजांच्या यादीमधून बाहेर पडला आहे. 

बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी स्वीकारताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. शफीउल इस्लामनं डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहितनं 6 चेंडूंत 2 धावा केल्या. त्यानंतर इस्लामनं सहाव्या षटकात शिखर धवनलाही ( 19) माघारी पाठवले. त्यानंतर लोकेश राहुलसोबत श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. 10 षटकांत भारतानं 2 बाद 71 धावा केल्या. राहुल व अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. राहुलनं 52 धावा केल्या आणि त्याच्या बाद होण्यानं अय्यरसोबतची 59 धावांची भागीदारी संपुष्टात आली. अय्यरनं 33 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 62 धावा केल्या. संघात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत जोरदार खेळ केला. धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. पण, मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी अर्धशतकी भागीदारी केली. नइमनं 34 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. युजवेंद्र चहलनं 12व्या षटकात नइमला धावबाद करण्याची संधी गमावली. या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचं रुपांतर 98 धावांत केले. ही जोडी फोडण्यासाठी रोहितला दीपक चहरलाच पाचारण करावे लागले. चहरनं तो विस्वास सार्थ ठरवला आणि मिथूनला ( 27) माघारी पाठवले.शिवम दुबेनं बांगलादेशचा हुकुमी एक्का मुश्फिकर रहीमला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे सामन्यानं अचानक कलाटणी घेतली. त्यानंतर शिवमने 81 धावा करणाऱ्या नइमचा त्रिफळा उडवून भारताला मोठे यश मिळवून दिले. नइमन पुढच्याच चेंडूवर आसीफ होसेनला आल्या पावली तंबूत पाठवले. नइमनं 48 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकार खेचून 81 धावा केल्या. त्यानंतर सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. युजवेंद्र चहलनं महमदुल्लाहला त्रिफळाचीत करून विक्रमाला गवसणी घातली. त्याचे ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 50वी विकेट ठरली. या कामगिरीसह त्यानं डेल स्टेनचा विक्रम मोडला. चहलनं 34 सामन्यांत 50 विकेट्स घेतल्या. स्टेनला 35 सामने खेळावे लागले होते. शिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर ट्वेंटी-20 50 विकेट्स घेणारा चहल तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश