Join us

मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...

Bengaluru Stampede Update: बंगळुरू पोलिसांनी आरसीबीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी ८ जून ही तारीख दिली होती. परंतू, आरसीबीने आम्हाला आजच जल्लोष साजरा करायचा आहे, असे म्हणत हट्ट लावून धरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:04 IST

Open in App

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवरील आयपीएल जिंकल्याच्या जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीवर ना राज्य सरकार जबाबदारी घेत आहे, ना बीसीसीआय. यामुळे आज बंगळुरू उच्च न्यायालयानेच याची दखल घेत याचिका दाखल करून घेतली होती. तसेच यावर आज सुनावणी देखील झाली. न्यायालयाने सरकारकडे चार प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. या पार्श्वभूमीवर मोठा खुलासा समोर येत आहे. 

बंगळुरू पोलिसांनी आरसीबीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी ८ जून ही तारीख दिली होती. परंतू, आरसीबीने आम्हाला आजच जल्लोष साजरा करायचा आहे, असे म्हणत हट्ट लावून धरला होता. तसेच पोलिसांची सूचना फेटाळून लावत आयपीएलचा सामना झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी जल्लोष साजरा केला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका डीसीपींसह ४० हून अधिक जण जखमी आहेत. 

आरसीबीच्या हट्टापाई या ११ जणांचा बळी गेला आहे. कर्नाटकमध्ये राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसने बंगळुरूने आयपीएल जिंकल्याची संधी साधली परंतू ती आता त्यांच्याच अंगलट आली आहे. भाजपा राज्य सरकारवर तुटून पडली आहे. अशावेळी पोलिसांची भूमिका समोर येत आहे. आरसीबीने आयपीएल जिंकताच समर्थक बंगळुरूच्या रस्त्यावर उतरले होते. यानंतर सकाळ होत नाही तोच आरसीबीची टीम अहमदाबादहून बंगळुरूला आली. तेव्हाच विजयी रॅली काढली जाणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

यामुळे आरसीबीचे चाहते जमू लागले. सुरुवातीला विधानसौध आणि नंतर चिन्नास्वामी अशी गर्दी जमली. बस परेडमध्ये कोणी सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांकडून आवाहन  केले जाऊ लागले. संख्या पाहून ही बस परेड रद्द करण्यात आली. परंतू, तोवर तुफान गर्दी जमली होती. डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार पोलिसांनी आरसीबीला आणि राज्य सरकारला आज आयोजन न करण्याचे सांगितले होते. तसेच रविवारी काही दिवसांनी विजयी रॅली काढण्यास सुचविले होते. परंतू, आरसीबीने आपण इतके दिवस परदेशी खेळाडूंना ठेवू शकत नाही असे सांगत पोलिसांचा हा प्रस्ताव धुडकावला होता. 

पोलिस सुत्रांच्या हवाल्याने या वृत्तानुसार लोकभावना जास्त होती, यामुळे ती शांत झाल्यावर योग्य नियोजन करून सत्काराचा कार्यक्रम घ्यावा, असे पोलिसांनी सांगितले होते. परंतू, ऑपरेशन सिंदूरमुळे आठवडाभर लांबलेल्या आयपीएलमुळे परदेशी खेळाडू जास्त काळ भारतात थांबू शकत नव्हते, असा युक्तीवाद आरसीबीने केला. यामुळे या खेळाडूंना लवकर रिलीज करण्याची गरज आरसीबीने व्यक्त केली होती. हे खेळाडू आज किंवा उद्या परतणार होते, सरकारलाही याचा फायदा उठवायचा होता. जरी सरकारने हा कार्यक्रम घेण्यास नकार दिला असता तरी वेगळ्याच प्रकारचा गोंधळ उडाला असता. मंगळावारी दुपारपासूनच आमचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर तैनात होते. ते दमलेले होते. हा पूर्णपणे वेडेपणा होता, असे या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरइंडियन प्रिमियर लीग २०२५बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरी