बंगळुरू - तब्बल १८ वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएलचं चॅम्पियन बनल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम त्यांच्या होम ग्राऊंडला पोहचली होती. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सरकारकडून आरसीबी टीमचा सत्कार सोहळा ठेवला होता. मात्र या सोहळ्याला प्रचंड गर्दी जमली, त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गालबोट लागले. या घटनेवरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आरसीबी टीम फ्रेंचायसीकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
RCB टीम फ्रेंचायसीने या दुर्घटनेत मृत झालेल्या लोकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय या घटनेतील जखमींना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आरसीबी केयर्स नावाने एक फंड तयार करणार असल्याचे सांगितले. आरसीबी टीम फ्रेंचायसीने निवेदन जारी करत म्हटलं की, बंगळुरूत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबी कुटुंबाला खूप वेदना झाल्या आहेत. चाहत्यांचा आदर आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून ११ मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. सोबतच या घटनेतील जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केयर्स नावाचा फंड तयार केला जात आहे. आमचे चाहते कायम आमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी राहतील. या दु:खात आम्ही एकत्र आहोत असं त्यांनी म्हटलं.
विजयाच्या जल्लोषात दु:खाचं सावट
आयपीएलच्या १८ व्या सीजनमध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने विजेता पदाचा खिताब पटकावला. त्यानंतर बुधवारी आरसीबी टीम अहमदाबादहून बंगळुरूला पोहचली. याठिकाणी टीमची विशेषत: विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले होते. या खेळाडूंना एअरपोर्टहून विधानसभा आणि तिथून चिन्नास्वामी स्टेडियमला सत्कार सोहळ्यासाठी नेण्यात आले. आरसीबी टीमची विजयी परेड काढण्यात येणार होती परंतु गर्दीचा अंदाज न आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टीमला थेट स्टेडियमला नेण्यात आले. लाखोंच्या संख्येने स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी झाली. यावेळी लोक झाडावर, कारवर, बसवर, भिंतीवर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.
हायकोर्टाने आयोजकांना फटकारले
बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर कर्नाटक हायकोर्टाने आयोजकांना फटकारले. एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी काय मार्गदर्शक सूचना नव्हती का, मेडिकल स्टाफ, रुग्णवाहिकेची व्यवस्था असायला हवी होती का? गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यावर काय उपाययोजना होत्या. जखमींना तातडीने रुग्णालयात का भरती केले नाही? यासारखे प्रश्न हायकोर्टाने आयोजकांना विचारले आहेत. सरकारने या घटनेवर त्यांचा रिपोर्ट सादर करावा असे निर्देशही कोर्टाने देत पुढील सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे.