Bengaluru Stampede, RCB victory parade: तब्बल १७ वर्षानंतर पहिल्यांदा RCB ने IPL 2025 चे विजेतेपद जिंकले. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी त्यांनी ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेड आयोजित केली होती. पण त्यांच्या आयोजनातील त्रुटींमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली आणि त्यात ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले. त्यामुळे या जल्लोषावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नुकत्याच झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) गंभीर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
BCCIच्या बैठकीत काय घडणार?
RCB ने साजरा केलेला विजयोत्सव जीवघेणा ठरला. गेल्या बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गोंधळ उडाला होता तेव्हा सुमारे अडीच लाख चाहते क्रिकेट स्टार्सना पाहण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला जमले होते. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे RCB प्रशासन आणि इतरांवर कोर्टात खटलाही दाखल करण्यात आला आहे. RCB व्यवस्थापनाने योग्य पद्धतीने विजयोत्सवाची तयारी केली नाही अशी माहिती कर्नाटक सरकारने कोर्टात सुनावणीदरम्यान दिली. त्यामुळे RCB व्यवस्थापनाचा पाय आणखी खोलात गेला आहे. अशातच BCCI बीसीसीआय त्यांच्या २८ व्या अॅपेक्स कौन्सिल बैठकीत इंडियन प्रीमियर लीगमधील विजयाच्या जल्लोषासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यावर चर्चा करणार आहे. ही बैठक शनिवारी होणार आहे. या बैठकीत ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल.
BCCI ने मान्ये केले की...
बीसीसीआयने मान्य केले आहे की हा कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे आयोजित करता आला असता. आता या घटनेला गांभीर्याने घेत, बोर्डाने त्यांच्या आगामी बैठकीच्या अजेंड्यात विजयोत्सवाच्या मुद्द्याचा समावेश केला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, शनिवारीच्या बैठकीत, आयपीएलमध्ये विजयोत्सव आयोजित करण्यासाठी स्पष्ट आणि सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यावर सखोल चर्चा होईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलली जातील. या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट अशा कार्यक्रमांमध्ये चाहत्यांची सुरक्षितता आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन हेच असेल.