IPL 2020 साठी बीसीसीआयनं कसली कंबर; 'या' महिन्यात खेळवणार लीग
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करण्याची मूभा मिळाली असून प्रेक्षकांविना सामने खेळवण्यासही परवानगी मिळाली आहे. पण, अजूनही प्रवास निर्बंध कायम असल्यामुळे सध्या तरी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) होणे शक्य दिसत नाही.
आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता अध्यक्ष सौरव गांगुलीनेही व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यास बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यामुळे बीसीसीआय विविध पर्यायांचा विचार करत आहे. आयपीएल आयोजनासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ आणि संयुक्त अरब अमिराती यांनी बीसीसीआयकडे प्रस्ताव ठेवला आहे.
25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचे 13 वे मोसम खेळवण्यासाठी बीसीसीआयनं कंबर कसली आहे, अशी माहिती IANS सोबत बोलताना सूत्रांनी दिली. ''याच कालावधीत आयपीएल खेळवली जाईल, हे आताच ठामपणे सांगणे अवघड आहे. कारण, त्यासाठी अनेक गोष्टी जुळून यायला हव्यात. बीसीसीआय 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या विंडोचा विचार करत आहे. पण, जर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि सरकारनं मान्यता दिली तरच हे शक्य आहे. पण, या तारखांमध्ये आयपीएल खेळवण्याची चर्चा सुरू आहे,''असे सूत्रांनी सांगितले.
याबाबत आयपीएल फ्रँयचाझींपैकी एका अधिकाऱ्यानं सांगितलं की,''या तारखा डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागा, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही योजना आखत आहोत, परंतु हे सर्व त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आम्ही आमच्याकडून तयारी करत आहोत.''
या तारखांमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द होणेही गरजेचे आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.