Join us  

कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड

त्यामुळे बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:01 PM

Open in App

मुंबई : भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने थेट नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फेरनिवड केली होती. याप्रकरणी बीसीसीआयने कपिल यांना नोटीस पाठवली आहे.

विश्वचषकानंतर बीसीसीआय प्रशिक्षकांच्या निवडची प्रक्रीया पार पाडली. यावेळी मुख्य प्रशिक्षकांच्या निवडीसाठी बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्षपद कपिल यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या समितीमध्ये कपिल यांच्यासह माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी होते.

सल्लागार समितीमधील या तिन्ही माजी क्रिकेटपटूंवर परस्पर हितसंबंध जपल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयमध्ये कोणतीही व्यक्ती फक्त एकच पद भूषवू शकते. त्यापेक्षा जास्त पद भूषवले की, परस्पर हितसंबंध जपल्याचे म्हटले जाते.

कपिल सध्याच्या घडीला समालोचन करत आहेत. बीसीसीआयशी ते समालोचक म्हणून करारबद्ध आहेत. त्याचबरोबर फ्लडलाइट या कंपनीचे ते मालक आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेपटूंच्या संघटनेचे ते सदस्य आहेत आणि त्याचबरोबर ते सल्लागार समितीचे अध्यक्षही होते. त्याचबरोबर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी हे दोघेही भारतीय क्रिकेपटूंच्या संघटनेचे ते सदस्य आहेत. त्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. त्यानुसार बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे. आता या तिघांनाही या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

टॅग्स :कपिल देवबीसीसीआय