Join us

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिली महत्त्वपूर्ण माहिती

Jasprit Bumrah: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करतोय. याच दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. लवकर बरा होण्यासाठी जसप्रीत सध्या खूप मेहनत घेत आहे.

By पंकज पाटील | Updated: August 31, 2022 08:18 IST

Open in App

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करतोय. याच दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. लवकर बरा होण्यासाठी जसप्रीत सध्या खूप मेहनत घेत आहे. मात्र अद्याप तो पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही.  तो दुखापतीतून चांगल्या प्रकारे सावरत असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

 आगामी टी-२० विश्वचषकासाठी बुमराह टीम इंडियात परतणार का? असा प्रश्न  विचारताच  एका संकेतस्थळाला मुलाखत देताना हा अधिकारी म्हणाला, ‘जसप्रीत बुमराह चांगल्या प्रकारे रिकव्हर होताना दिसतोय. तो आगामी टी-२० विश्वचषक सामन्यांत संघात असेल अशी आशा आहे. तो दुखापतीतून चांगल्या प्रकारे सावरत आहे. आमचे डॉक्टर्स त्याच्या सातत्याने संपर्कात आहेत. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नसतानादेखील आमचे त्याच्यावर लक्ष आहे. तो भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेपर्यंत पुनरागमन करू शकेल. टी-२० विश्वचषकापर्यंत तर तो नक्कीच पूर्णपणे बरा झालेला असेल. मात्र सध्याच यावर स्पष्ट भाष्य करणे घाईचे ठरेल.’

 मागील अनेक महिन्यांपासून बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. गोलंदाजी करण्याच्या त्याच्या विशेष पद्धतीमुळे त्याच्या शरीरावर परिणाम होतो आणि त्याला दुखापत होते. मात्र वेळोवेळी तो दुखापतीतून सावरलेला आहे आणि भारतासाठी खेळताना त्याने चांगली कामगिरी केलेली आहे.  बुमराह मुंबईमध्ये राहत आहे. त्यानंतर फिटनेट टेस्टसाठी तो परत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परतणार आहे.  १५ सप्टेंबरपर्यंत बीसीसीआयला टी-२० विश्वचषकासाठी संघ  निवडायचा आहे. त्यामुळे जसप्रीतकडे अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. जसप्रीत टी-२० विश्वचषकातून बाहेर राहिला तर भारताकडे वेगवान गोलंदाजांमध्ये फक्त भुवनेश्वर कुमार असेल. त्यामुळे जसप्रीत दुखापतीतून बरा होणे भारतासाठी खूप गरजेचे आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ
Open in App