मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवड प्रक्रिया नेहमी वादात अडकली आहे. अनकेदा निवड समितीच्या अनेक निर्णयांवर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ज्ञ यांनी नाराजी प्रकट केली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या संघ निवड प्रक्रियेवर टीकेची तोफ डागली आहे. बीसीसीआय मुंबईच्या खेळाडूंना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप गावसकर यांनी केला. मुंबईच्या सिद्धेश लाडची बाजू मांडताना गावसकर यांनी आणखी अमोल मुजुमदारवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सिद्धेश लाडला भारत 'A' संघात स्थान देण्यात आले नाही. यावर विचारले असता गावसकर यांनी नाराजी प्रकट केली. अमोल मुझुमदार सारखी सिद्धेश कारकीर्द संपू नये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले," संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा सिद्धेशने डाव सावरला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला भारत 'A' संघात स्थान मिळू नये हे दुर्दैवी आहे."