नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची अवस्था अतिशय सुमार झाली होती. तसेच पाकिस्तानला सुपर ८ फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता. दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे. आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या ११४ धावांत गुंडाळले. त्यानंतर ११५ धावांचं आव्हान बांगलादेशच्या संघानं अवघ्या ९१ चेंडूमध्ये ८ गडी राखत पार केलं.
या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानला साहिबजादा फरहान आणि माज सदाकत यांनी सावध सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र नाहीद राणा याने भेदक मारा करत पाकिस्तानच्या डावाला सुरुंग लावला. वरच्या फळीतील एकाही फलंदाजाला बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर तग धरता न आल्याने पाकिस्ताची अवस्था ९ वाद ८२ अशी झाली होती. मात्र फहीम अश्रफने फटकावलेल्या ३७ धावांमुळे पाकिस्तानला १०० धावांचा टप्पा ओलांडता आला. अखेरीस नाहीद राणाने घेतलेले पाच बळी आणि मेहदी हसन मिराज याने टिपलेल्या तीन विकेट्सच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांवर गुंडाळला.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सैफ हसन केवळ ४ धावांवर बाद झाला. मात्र ४२ चेंडूत नाबाद ६७ धावा फटकावणारा तंझिद हसन आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावा जोडत बांगलादेशचा विजय निश्चित झाला. शांतो २७ धावा काढून बाद झाला. मात्र बांगलादेशने अवघ्या ९१ चेंडूमध्ये विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ५ बळी टिपून पाकिस्तानची दाणादाण उडवणारा सामनावीराचा मानकरी ठरला.