Join us  

बांगलादेशचा खेळाडू अजूनही भारतातच; कोलकात्यामध्ये घडलं असं काही...

या सामन्यानंतर कोलकात्यामध्ये असं घडलं तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:45 PM

Open in App

मुंबई : भारतामध्ये बरेच बांगलादेशचे नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करतात, असे म्हटले जाते. बांगलादेशचा एक खेळाडूही मालिका संपली तरी अजूनही भारतामध्येच असल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील अखेरचा कसोटी सामना कोलकात्यामध्ये झाला, तर मग या सामन्यानंतर कोलकात्यामध्ये असं घडलं तरी काय...

पराभवानंतर बांगलादेशचा संघ मायदेशी परतला. पण त्यामध्ये अपवाद होता त्यांच्या सैफ हसन या खेळाडूचा. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये झाला. त्यानंतर २५ नोव्हेंबरला बांगलादेशचा संघ मायदेशी परतला. पण अजूनही त्यांचा एक खेळाडू अजूनही भारतात आहे.

भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. बांगलादेशने रविवारी ६ बाद १५२ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी ८९ धावांची गरज होती. भारताने ५० मिनिटांपेक्षा कमी वेळेत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे, सलग चौथ्यांदा डावाने विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला.

बांगलादेशचा संघ २५ नोव्हेंबरला जर बांगलादेशमध्ये पोहोचला तर हसन नेमका भारतामध्ये काय करतोय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.  तर घडले असे की, हसनचा भारताचा व्हिसा हा २४ नोव्हेंबरला संपला. त्यामुळे तो जेव्हा मायदेशी जायला रवाना झाला तेव्हा त्याचा व्हिसा संपला होता. त्यामुळे त्याला बांगलादेशमध्ये जाण्यास नकार देण्यात आला. आता त्याला लवकरात लवकर व्हिसा मिळवून देण्याची प्रक्रीया सुरु आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश