बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या डावा दरम्यान धावबादच्या निर्णयावरून मैदानात मोठा राडा झाला. पाकिस्तानच्या डावातील ३९ व्या षटकात बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आगा याला ज्या पद्धतीने बाद केले त्यावरून या वादाला तोंड फुटले.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करत असताना सलमान आगा याच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानचा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत होता. यादरम्यान, ३९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराज याने सलमान आगाला अजब पद्धतीने धावबाद केले. मेहदी हसन मिराजने टाकलेला हा चेंडून पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान याने समोरच्या दिशेने तटवला. तेवढ्यात मिराजने चेंडूला पायाने अडवले. मात्र यादरम्यान, नॉन स्ट्रायकर एंडला असलेला सलमान आगा आणि गोलंदाज मिराज यांच्यात टक्कर झाली.
सलमान आगा तेव्हा क्रिझच्या बाहेर होता. तसेच चेंडू पायाजवळ थांबल्याने तो डेड झाला असावा असं वाटून आगा तिथेच थांबला. तसेच त्याने खाली वाकून चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात मेहदी हसन मिराजने चपळाई दाखवत चेंडू हातात घेतला आणि स्टंपवर फेकला. यष्ट्या उडाल्यावर मिराजने जोरदार अपील केलं. गोंधळलेल्या सलमान आगाला काय झालं हेच कळलं नाही. तोपर्यंत पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून सलमान आगाला धावबाद ठरवले.
मेहदी हसन मिराजने दाखवलेली चपळाई आणि पंचांनी धावबाद ठरवल्याने सलमान आगा कमालीचा नाराज झाला. तसेच नाराजी व्यक्त करतच त्याने मैदान सोडले. यादरम्यान, सलमान आगा याने ६२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या.
आता या घटनेनंतर मेहदी हसन मिराजने खिलाडूवृत्ती दाखवली नाही का? सलमान आगा हा खरोखरच धावबाद होता का? पंचांनी निर्णय देताना विचार केला नाही का? या प्रश्नांवरून समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.