Join us  

IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकी खेळीला ऑसींच्या कॅमेरून ग्रीनचे सडेतोड उत्तर, यजमानांनी घेतली आघाडी

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि वृद्धीमान सहा भोपळ्यावर माघारी परतले. पण, चेतेश्वर पुजारा ( ५४) आणि रहाणे ( ११७) यांनी टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रहाणेनं २४२ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह नाबाद ११७ धावा केल्या

By स्वदेश घाणेकर | Published: December 07, 2020 12:27 PM

Open in App

कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. रहाणेच्या नाबाद ११७ धावांच्या जोरावर भारत अ संघानं ९ बाद २४७ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचा निम्मा संघ ९८ धावांवर परतला होता, परंतु कॅमेरून ग्रीन आणि टीम पेन यांनी दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिले. ही डोईजड जोडी उमेश यादवनं तोडली. पण, ग्रीननं नाबाद शतकी खेळी करताना दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाला ३९ धावांची आघाडी मिळवून दिली. 

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि वृद्धीमान सहा भोपळ्यावर माघारी परतले. पण, चेतेश्वर पुजारा ( ५४) आणि रहाणे ( ११७) यांनी टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रहाणेनं २४२ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह नाबाद ११७ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं डाव घोषित केला. उमेश यादवनंही १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २४ धावांची आक्रमक खेळी केली. रहाणे व कुलदीप यादव या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कुलदीपनं ७८ चेंडूंत १५ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचे सलामीवीरही अपयशी ठरले. विल पुकोवस्की ( १) आणि जो बर्न्स ( ४) यांना उमेश यादवनं माघारी पाठवलं. मार्कस हॅरिस ( ३५),  कर्णधार ट्रॅव्हीस हेड ( १८) आणि निक मॅडीन्सन ( २३) यांनी ऑसींचा डाव सावरला, परंतु ते ९८ धावांवर माघारी परतले. ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या ऑसींसाठी ग्रीन व पेन ही जोडी धावली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. उमेश यादवनं ही जोडी तोडली. टीम पेन ८८ चेंडूंत ४ चौकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. पण, ग्रीन एका बाजूनं खिंड लढवत राहिला. दुसऱ्या दिवसअखेर त्यानं १७३ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून नाबाद ११४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ संघानं ८ बाद २८६ धावा करताना ३९ धावांची आघाडी घेतली. उमेश यादवने तीन, तर मोहम्मद सिराज व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेआर अश्विनआॅस्ट्रेलिया