Asia Cup 2025 IND vs PAKआशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील लढतीतही भारतीय संघानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियासमोर १७२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं विक्रमी शतकी भागीदारीसह संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत पाकिस्तानी गोलंदाजाांचे खांदे पाडले. शुबमन गिल अर्धशतक हुकलं. पण तो त्याचं काम चोख बजावून तंबूत परतला. अभिषेक शर्माला या सामन्यात शतकाची संधी होती. पण तोही यापासून वंचित राहिला. पण शेवटी भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला शह देत आपली दादागिरी दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानच्या सलामीवीराचं अर्धशतक
दुबईच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या नव्या प्रयोगासह मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने साखळी फेरीच्या तुलनेत चांगली सुरुवात केली. पण २१ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामीवीर साहिबजादा याने दोन कॅच सुटल्यावर ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून शिवम दुबेनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
धावांचा पाठलाग करताना अभिषेक-गिल जोडीची विक्रमी भागीदारी! तिलक वर्मानं संपवली मॅच
याधावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं शाहीन शाह आफ्रिदीचं षटकारानं स्वागत करत धावांचा पाठलाग करण्यात टीम इंडिया कमी पडणार नाही, त्याची हमी दिली. दुसऱ्या बाजूनं उप कर्णधार शुबमन गिलनंही त्याला उत्तम साथ दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६९ धावा कुटल्या. हाच तोरा जोडीनं पुढेही कायम ठेवला अन् पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची शतकी भागीदारी रचत सामना सेट केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने केलेली पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. शुबमन गिल २८ चेंडूत ४७ धावांची खेळी करून बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठीआलेल्या सूर्यकुमार यादवला तीन चेंडूचा सामना करून खातेही उघडता आले नाही. अभिषक शर्मानं ३९ चेंडूत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले. संजू सॅमसन १३ धावा करून परतल्यावर तिलक वर्मानं १९ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी करत मॅच १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवरच संपवली.