आमच्या संघाला एका स्टारची गरज नाही, आमच्याकडे ११ भावंडं आहेत! महिषा थिक्षानाचे हे ट्विट काल प्रचंड व्हायरल झाले.
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती. ३ सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक २०२२ चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक ६९ टक्के मत भारताच्या बाजूने होती, त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. श्रीलंकेच्या वाट्याला शून्य टक्के मतं आली. म्हणजे विचार करा दासून शनाकाच्या श्रीलंकन संघाकडून क्रिकेटप्रेमींच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. पण, हा संघ मनाशी ठाम निर्धार करून दुबईत दाखल झाला होता. म्हणूनच अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या पराभवानंतरही तो खचला नाही, आणखी ताकदीने उभा राहिला आणि जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांना इंगा दाखवत ८ वर्षांनी आशिया चषक उंचावला...
श्रीलंका हा आपला शेजारी सध्या कोणत्या परिस्थितीतून जातोय याची सर्वांना कल्पना आहेच. आर्थिक डोलारा कोसळल्यानंतर श्रीलंकेची लोकं अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. पेट्रोल-डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल पंपांबाहेर लांबच लांब रांगा... २-३ दिवस रांगेत उभे राहूनही न मिळणारे इंधन, या लोकांना रात्रीच्या वेळेस बनपाव वाटणारे माजी क्रिकेटपटू... १९४८साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेसमोर उभे राहिलेलं हे सर्वात मोठं आर्थिक संकट आहे. मदतीसाठी श्रीलंकन सरकार अन्य देशांकडे आस लावून बसलेले आहेत... नागरिकही ही परिस्थिती कधी सुधरेल याची प्रतिक्षा करतायेत. याच आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतून आशिया चषक दुबईत हलवण्यात आला, तर का ही स्पर्धा आयोजनासाठी श्रीलंकेकडे पैसेच नाहीत...
एकतर बऱ्याच वर्षांनी आशिया चषक स्पर्धा आयोजनाचा मिळालेला मान, श्रीलंकेला गमवावा लागला. या संघाकडून शून्य टक्के जेतेपदाची अपेक्षा चाहत्यांना होती. त्यात पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने आसमान दाखवल्यानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे अशक्यच... पण मायदेशातील जनतेचा संघर्ष डोळ्यासमोर ठेऊन हा संघ एकजुटीने उभा राहिला.. या संघात स्टार खेळाडू म्हणून मिरवावा असे एकही नाव नव्हते... त्यामुळेच कुणा एकाने दडपण न घेता, ११ खेळाडूंनी ते वाटून घेतले आणि संघर्ष करण्याचा प्रण केला.. १०५ धावांवर ऑल आऊट आणि त्यानंतर अफगाणिस्तानने १०.१ षटकांत मिळवलेल्या विजयानंतरही हा संघ मजबूतीने उभा राहिला तो याच एकजुटीमुळे. बांगलादेशवर अखेरच्या षटकात थरारक विजय मिळवून त्यांनी स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले..
सुपर ४ मध्ये त्यांची खरी कसोटी लागणार होती आणि त्यावरही ते खरे उतरलेच... अफगाणिस्तानला पराभवाची परतफेड केली, भारताविरुद्ध १ चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला आणि त्यानंतर सलग दोन सामन्यांत पाकिस्तानला आसमान दाखवून जेतेपद नावावर केले. श्रीलंकेच्या या विजयाचं सेलिब्रेशन हे फक्त १५ खेळाडूंनी केले नाही, तर २ कोटींहून अधिक श्रीलंकन वासियांनी केले... हा विजय त्यांना नवा आशेचा किरण दाखवणारा ठरला... या विजयाने
श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर नक्की येणार नाही, परंतु सोन्याच्या लंकेची गेलेली रया मात्र पुन्हा मिळवण्याची ताकद नक्की आशिया चषक विजयाने देशवासियांना मिळेल, याची खात्री आहे...