दुबई, आशिया चषक 2018: शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रायुडू व धवन बाद होताच भारताच्या अन्य फलंदाजांनी झटपट तंबूची वाट धरली. त्यामुळे भारताला 50 षटकांत 7 बाद 285 धावांवर समाधान मानावे लागले.
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि धवन यांनी संघाला सकारात्मक सुरूवात करून दिली, परंतु रोहित आठव्या षटकात माघारी फिरला. हाँगकाँगच्या एहसान खानने त्याला माघारी धाडले. 13 षटकांत भारताच्या 1 बाद 70 धावा झाल्या आहेत.
त्यानंतर धवन आणि रायुडूने संघाला मोठ्या धावसंख्येकडे कूच करून दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. 29 षटकांत भारताने 1 बाद 161 धावा केल्या होत्या. मात्र 30 व्या षटकात भारताला दुसरा धक्का बसला. अंबाती रायुडू 60 धावांवर बाद झाला.
धवनने आपली फटकेबाजी कायम राखताना कारकिर्दीतले 14 वे शतक झळकावले. धवनने 120 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकार खेचून 127 धावा चोपल्या. सहा महिन्यांनंतर त्याने वन डेतील पहिले शतक झळकावले आणि युवराज सिंगच्या शतकांची बरोबरी केली. धवन बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक ( 33) व महेंद्रसिंग धोनी ( 0) लगेच बाद झाल्याने भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. केदार जाधवने नाबाद 28 धावा करताना संघाला 50 षटकांत 7 बाद 285 धावांपर्यंत मजल मारून दिली. हाँगकाँगच्या किंचित शहाने तीन, तर एहसान खानने दोन विकेट घेतल्या.