Join us

IPL 2021: "कॅप्टन कोहलीला सर्वच मिस करतील...", माजी भारतीय क्रिकेटपटूचं मोठं विधान

IPL 2021: आयपीएलमध्ये आज एलिमिनेटर सामना होत आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:31 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये आज एलिमिनेटर सामना होत आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे. बंगलोरसाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आज जर संघ पराभूत झाला तर स्पर्धेतील आव्हान तर संपुष्टात येईलच पण विराट कोहलीसाठी संघाचा कर्णधार म्हणून आजचा शेवटचा सामना ठरू शकतो. या सामन्याआधी कोहलीच्या कॅप्टन्सीबाबत भारतीय माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं महत्त्वाचं विधान केलं आहे. 

आकाश चोप्रानं कोहली संदर्भात एक ट्विट केलं आहे. काही वर्षांनंतर कॅप्टन कोहलीची सर्वजण आठवण काढतील, असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. सध्या जे लोक विराट कोहलीच्या नेतृत्त्वगुणांबाबत शंका उपस्थित करत आहेत. तेच लोक विराट कोहलीच्या कॅप्टन्सी आणि रणनितीची काही वर्षांनी उदाहरणं देतील व कौतुक करतील, असं मत आकाश चोप्रानं व्यक्त केलं आहे. 

आकाश चोप्रानं मांडलेल्या या मतावर ट्विटरवर खूप वाद-विवाद सुरू आहेत. कोहलीच्या कॅप्टन्सीला कसोटी क्रिकेटमध्ये खूप मिस करतील पण वन-डे आणि ट्वेन्टी-२० मध्ये असं होणार नाही, असं काही यूझर्सनं म्हटलं आहे. तर काही जणांनी नक्कीच सर्वजण कोहलीच्या आक्रमक स्वभावाला मिस करतील असं म्हटलं आहे. त्यानं ज्या पद्धतीनं संघाला आक्रमक स्वरुप दिलं आहे त्याचं नक्कीच कौतुक केलं जाईल, असंही काहींनी म्हटलं आहे. 

RCBसोबतच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्वही सोडणारआयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधीच कोहलीनं आरसीबीचा कर्णधार म्हणून हे आपलं शेवटचं सीझन असल्याचं जाहीर केलं होतं. यापुढील काळात जोवर मी खेळतोय तोपर्यंत बंगलोरच्या संघाकडूनच खेळत राहीन पण संघाचा कर्णधार असणार नाही, असंही कोहलीनं स्पष्ट केलं होतं. कोहलीनं त्याआधीच ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचंही जाहीर केलं आहे. 

यंदाची ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोहलीची शेवटची आयसीसी स्पर्धा ठरणार आहे. त्यामुळे आयपीएल असो किंवा मग वर्ल्डकप दोन्ही स्पर्धांचं जेतेपद प्राप्त करुनच कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याचा कोहलीचा प्रयत्न असणार आहे. 

विराट कोहलीची जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. पण संघाचा कर्णधार म्हणून कोहलीवर आजवर बरीच टीका झाली आहे. कॅप्टन्सीच्या काळात कोहलीची वैयक्तिक कामगिरी जरी सर्वोत्तम राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहली भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App