Join us  

रोमहर्षक! अटीतटीच्या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात 

शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:44 AM

Open in App
ठळक मुद्देशेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात विराट कोहलीच्या भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीविशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ

अॅडलेड - शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. कालच्या चार बाद 104 वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर ट्रॅव्हीस हेडच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर शॉन मार्श आणि टीम पेन यांनी सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. दरम्यान, बुमराने शॉन मार्शची (60) विकेट काढत भारताला सहावे यश मिळवून दिले.  त्यानंतर चिवट फलंदाजी करत असलेल्या टीम पेनलाही (41) माघारी धाडत बुमाराने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांगारूंच्या शेपटाने चिवट झुंज दिल्याने भारताचा विजय लांबला. 121 चेंडूत 28 धावांची सावध खेळी करणाऱ्या पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कच्या साथीने 41 आणि नाथन लायनच्या साथीने 31 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरीस बुमरानेच कमिन्सचा अडथळा दूर केला. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 64 धावा आणि भारताला विजयासाठी एक विकेट असे समीकरण असताना नाथन लायन आणि जोस हेझलवूड यांनी झुंज दिल्याने भारताच्या गोटात धाकधुक वाढली. अखेरीस अश्विनने  हेझलवूडची विकेट काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 291 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्माने एक गडी टिपला. तत्पूर्वी खेळाच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजार आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 307 धावा फटकावत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान ठेवले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ