आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना रविवारी (८ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या ऐतिहासिक लढतीपूर्वी माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना वगळून संघात धाडसी बदल करण्याची गरज गावस्करांनी व्यक्त केली आहे.
सलामीवीर अभिषेक शर्मा या संपूर्ण स्पर्धेत धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असूनही, या स्पर्धेतील ७ डावांत त्याने केवळ १२.७१ च्या सरासरीने ८९ धावा केल्या आहेत. विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध तो वारंवार बाद होत असल्याचे गावस्करांनी नमूद केले.
"अभिषेक आपल्या चुकांमधून शिकताना दिसत नाही. गोलंदाज त्याला एकाच क्षेत्रात चेंडू टाकून बाद करत आहेत. अंतिम सामन्यात इशान किशनने संजू सॅमसनसोबत सलामीला यावे आणि संघात रिंकू सिंगचा समावेश करावा," असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले. रिंकू सिंगचा आत्मविश्वास मोठ्या सामन्यात भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी दर्शवला.
केवळ फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजी युनिटमध्येही बदलाचा सल्ला गावस्करांनी दिला आहे. गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती गेल्या काही सामन्यांत महागडा ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने १३ चेंडूत ४२ धावा दिल्या होत्या. गावस्करांच्या मते, अहमदाबादच्या मोठ्या मैदानावर कुलदीप यादव अधिक प्रभावी ठरू शकतो. सीमारेषा लांब असल्यामुळे कुलदीप फलंदाजांना आपल्या फ्लाईटेड चेंडूंवर फसवू शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे गावस्करांच्या या सल्ल्याचा विचार करून संघात बदल करतात की आपल्या जुन्याच जोडीवर विश्वास दाखवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
फायनलसाठी सुनील गावस्कर यांची प्लेइंग इलेव्हन:
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
Web Summary : Sunil Gavaskar suggests dropping struggling Abhishek Sharma and Varun Chakravarthy for the T20 World Cup final against New Zealand. He advocates for Ishan Kishan, Sanju Samson, Rinku Singh, and Kuldeep Yadav's inclusion for a stronger team.
Web Summary : सुनील गावस्कर ने टी20 विश्व कप फाइनल के लिए अभिषेक शर्मा और वरुण चक्रवर्ती को बाहर करने का सुझाव दिया है। उन्होंने मजबूत टीम के लिए इशान किशन, संजू सैमसन, रिंकू सिंह और कुलदीप यादव को शामिल करने की वकालत की है।