कोलकाता : भारतीय फलंदाज जुन्या लयीत परतले असले तरी गोलंदाजांना अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत आज टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला आरपारची लढाई लढायची आहे. कारण, या सामन्यातील विजेत्या संघासाठी उपांत्य फेरीची दारे खुली होतील.
वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव आणि भारताने झिम्बाब्वेवर मिळविलेला विजय, यामुळे गट-१ मधील हा सुपर-८ चा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो असा बनला आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर एक रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यातील विजेता संघ ५ मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत
इंग्लंडशी भिडेल.
मोक्याच्या क्षणी फलंदाजांचा फॉर्म परतला
झिम्बाब्वेविरुद्ध भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. लयीत परतले आहे. संजूने केवळ २४ धावा केल्या असल्या, तरी सुरुवातीलाच धावगती वाढवून त्याने इतर फलंदाजांवर सकारात्मक प्रभाव टाकला. त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे अभिषेक शर्माचाही आत्मविश्वास दुणावला. याआधी सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेकची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या १५ होती. पण, त्याने अर्धशतक झळकावत पुनरागमन केले. तिलक वर्माने सहाव्या क्रमांकावरील आपल्या नव्या भूमिकेत नव्या जोशात फलंदाजी करत १६ चेंडूंत ४४ धावा कुटल्या. भारताने ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभारला होता.
वेस्ट इंडिजचे तगडे आव्हान
दुसरीकडे, वेस्ट इंडिजने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे. सुरुवातीला थोडे सावधपणे खेळणे आणि नंतर बेधडक आक्रमक फटकेबाजी करणे. याच रणनीतीच्या जोरावर त्यांनी सलग पाच सामने जिंकले. मात्र, द. आफ्रिकेने त्यांची विजयाची मालिका खंडित केली.
चिंतेचे ढग
जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग यांनी शानदार कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आपल्या जुन्या लयीत नाही. हा मिस्ट्री स्पिनर टप्प्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असून, तो गरजेपेक्षा जास्त प्रयोग करत आहे. चक्रवर्तीच्या अपयशामुळे द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला मोठा फटका बसला होता.