T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषकाच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला १० फेब्रुवारीच्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेक शर्माची तब्येत बिघडल्याने संघ व्यवस्थापनाची धाकधूक वाढली आहे.
अभिषेक शर्माला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सराव सत्रातही सहभागी होऊ शकला नव्हता. सहायक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती की, अभिषेकला दोन दिवसांत बरे वाटेल, अशी आशा आहे. मात्र, गेल्या २४ तासांत त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याला पोटदुखाची त्रास जाणवत होता. मात्र, तरीही तो संघाकडून सलामी देण्यासाठी मैदानात आला. परंतु, त्याला त्या सामन्यात खातेही उघडता आले नाही आणि फिल्डिंग करणेही कठीण झाले होते. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतरही त्याच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नाही.
भारताचा आगामी सामना नामिबियाविरुद्ध आहे, परंतु सर्वांचे लक्ष १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे आहे. अभिषेक शर्मा १५ तारखेपर्यंत पूर्णपणे बरा झाला नाही तर, हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल. अशा स्थितीत इशान किशन आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
अभिषेकसोबतच इतर दोन प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जसप्रीत बुमराहने सराव सत्रात भाग घेतला, परंतु तो त्याच्या पूर्ण वेगाने गोलंदाजी करताना दिसला नाही. शिवाय, वॉशिंग्टन सुंदरही फिट नसल्याचे म्हटले जात आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी होणाऱ्या अधिकृत पत्रकार परिषदेत या तिन्ही खेळाडूंच्या खेळण्याबाबतची अंतिम स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.