आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. क्रिकेटविश्वात बलाढ्य संघांमध्ये भारतीय संघाची गणना केली जात असली तरी टी-२० विश्वचषकात भारताची कुमकुमत बाजू समोर आली आहे.
या विश्वचषकात भारतीय फलंदाजांना विशेषतः ऑफ-स्पिनर्सविरुद्ध मोठा संघर्ष करावा लागल्याचे पाहायला मिळाले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत फिरकी गोलंदाजीवर एकूण १९ विकेट्स गमावल्या आहेत. यातील १२ विकेट्स ऑफ-स्पिनर्सनी घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पॉवरप्लेमध्येच भारताने ४ वेळा ऑफ-स्पिन गोलंदाजीवर विकेट्स टाकल्या आहेत, ज्यामध्ये अभिषेक शर्मा आणि इशान किशन प्रत्येकी दोन वेळा बाद झाले आहेत.
झिम्बाब्वेचा मास्टर प्लॅन
झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू सिकंदर रजा सध्या डाव्या हाताच्या दुखापतीने त्रस्त असला, तरी तो भारताच्या या कमकुवतपणाचा फायदा उचलण्यासाठी सज्ज आहे. रजाच्या ऑफ-स्पिनने टीम इंडियाला अडचणीत आणण्याची रणनीती झिम्बाब्वेने आखली आहे.
भारतासमोर मोठे आव्हान
चेन्नईची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल मानली जाते. अशा स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोणती नवी रणनीती आखतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निव्वळ रन-रेट किंवा संघ निवडीपेक्षा 'ऑफ-स्पिन'चा सामना कसा करायचा? हाच मुख्य प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे.