मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, तेंडल्या आदी विविध नावानं भारतीयांच्या घराघरात ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आज 47 वर्षांचा झाला. कोरोना व्हायरसच्या संकटाशी मुकाबला करणाऱ्या आरोग्य सेवक, डॉक्टर्स, पोलीस यांना मानवंदना देण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय तेंडुलकरनं घेतला आहे. तेंडुलकरमुळे क्रिकेट हा खेळ देशातील घराघरात पोहोचला... तेंडुलकरची प्रत्येक खेळी पाहण्यासाठी स्टेडियम, टीव्ही शॉप बाहेर, जिथे जिथे टिव्हीवर त्याचा खेळ पाहता येईल तिथे तौबा गर्दी व्हायची. विराट कोहली- महेंद्रसिंग धोनी यांच्या नव्या जनरेशनमध्येही तेंडुलकरच्या खेळीचे आजही दाखले दिले जातात... क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडणाऱ्या तेंडुलकरनं सामाजिक भानही तितक्यात जबाबदारीनं जपलं...
मुंबई-महाराष्ट्रासह देशावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेंडुलकरनं कोणताही गाजावाजा न करता त्याच्या परिनं मदत केली. मुंबईवर झालेला 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना तेंडुलकरनं अनोखी श्रद्धांजली वाहिली होती. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस म्हटला, तर काही चुकीचं ठरणार नाही. पाकिस्तानातून समुद्रामार्गे मुंबईत अतिरेकी घुसून देशाच्या आर्थिक राजधानीला तीन दिवस वेठीस धरतात. या अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार करून शेकडो लोकांचा जीव घेतला. या हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात तेंडुलकरनं शतकी खेळीसह टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.
प्रमथ फलंदाजी करताना इंग्लंडनं पहिल्या डावात 316 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारताला पहिल्या डावात 241 धावाच करता आल्या. इंग्लंडनं दुसरा डाव 9 बाद 311 वर घोषित करून भारतासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. गौतम गंभीर ( 66) आणि वीरेंद्र सेहवाग ( 83)यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण, राहुल द्रविड ( 4) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ( 26) लगेच बाद झाल्यानं तेंडुलकरनं सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं युवराज सिंगला सोबत घेताना भारताला विजय मिळवून दिला. युवीनं नाबाद 85 धावा केल्या, तर तेंडुलकर 103 धावांवर नाबाद राहिला. तेंडुलकरचे कसोटी कारकिर्दीतील हे 41वे शतक होते आणि त्यानं हे शतक 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना समर्पित केले होते.