मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगने युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आयपीएलनं अनेक अनोळखी क्रिकेटपटू जगासमोर आणले. त्याचा भारतीय संघालाच नव्हे, तर अन्य संघांनाही फायदा झाला आहे. आयपीएलमुळेच टीम इंडियाला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या हे रत्न मिळाले. पण, आयपीएलने केवळ खेळाडूंचीच लाईफ बनवली नाही, तर त्यांच्याशी निगडीत प्रत्येकाला मालामाल केले. आयपीएलच्या 2019च्या हंगामात पंच आणि सामनाधिकारी यांना किती मानधन देण्यात आले याची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) बुधवारी जाहीर केली. त्यातील आकडे पाहून तुमचे डोळे नाही विस्फारले तर अजब ठरेल.
बीसीसीआयने 2019च्या आयपीएलमध्ये पंच आणि सामनाधिकारींना दिलेल्या पगाराची यादी जाहीर केली. 21 ऑगस्टला बीसीसीआयनं त्यासाठी 25 लाखांहून अधिक रक्कम काढली. बीसीसीआयच्या माहितीनुसार भारताचा माजी गोलंदाज जावगल श्रीनाथ सर्वाधिक मानधन घेणारा सामनाधिकारी ठरला आहे. श्रीनाथला जवळपास 52 लाख 45, 128 रुपये मानधन म्हणून बीसीसीआयनं दिले.
![]()
पाहा कोणाला किती मानधन
- सी. शामसुद्दीन - 41,00,242
- मनू नायर - 41,96,102
- नितीन मेनन - 52,45,128
- जवागल श्रीनाथ - 52,45,128
- एस रवी - 42,46,056
- अनिल दांडेकर - 32,96,938
- यशवंत बर्डे - 32,96,938
- नंदन - 37,04,659
- नारायणकुट्टी व्ही - 32,96,938
IPLची संघ संख्या वाढणार, दोन नव्या संघांसाठी टाटा, अदानी, गोयंका शर्यतीत
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दहा संघांमध्ये ठसन पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने आयपीएलमधील संघ संख्या 8 वरून 10 करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या नव्या दोन संघांसाठी टाटा ( रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) या कॉर्पोरेट्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयनं 2010च्या आयपीएलमध्ये 10 संघाचा फॉर्म्युला आजमावला होता. पण, विवादानंतर हा फॉर्म्युला रद्द करण्यात आला. आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये लंडन येथे एक बैठक झाली. त्यात 2020च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आणि 2021मध्ये हे संघ खेळतील.