'पोलिसांना कसली मस्ती?' ओळखपत्र असूनही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याने शिरसाट संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:08 IST2026-01-16T10:42:13+5:302026-01-16T12:08:32+5:30
माजी महापौर विकास जैन जखमी, संतापलेल्या शिरसाटांचा पोलीस आयुक्तांना खडा सवाल

'पोलिसांना कसली मस्ती?' ओळखपत्र असूनही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याने शिरसाट संतापले
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांची आतुरता शिगेला पोहोचलेली असतानाच, आज सकाळी मतमोजणी केंद्राबाहेर रक्ताचा सडा पडला. गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले असून, त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून "पोलिसांना कसली मस्ती आहे?" असा संतप्त सवाल विचारला आहे.
काय घडले मतमोजणी केंद्रावर?
आज सकाळी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी रांगेत उभे होते. यावेळी अधिकृत ओळखपत्रे सोबत असतानाही पोलिसांनी प्रतिनिधींना अडवल्याचे सांगितले जाते. यातून झालेल्या वादाचे पर्यावसान लाठीमारात झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव आणि इतर तीन कार्यकर्ते रक्ताळलेल्या अवस्थेत केंद्राबाहेर पडले.
शिरसाटांचा 'रुद्र' अवतार आणि ठिय्या
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींची अवस्था पाहून त्यांचा संयम सुटला. त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांना फोन करून आपला तीव्र निषेध नोंदवला. "प्रतिनिधींकडे आयकार्ड असताना बळाचा वापर करणे हा शुद्ध मस्तवालपणा आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना पोलीस बेफिकीर आहेत आणि प्रतिनिधींना मारहाण करतात, ही कसली कायदा-सुव्यवस्था?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोषी पोलीस अधिकारी 'देशमुख' यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, पण तणाव कायम
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, जोपर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा एकही प्रतिनिधी मतमोजणीसाठी आत जाणार नाही, असा पवित्रा शिंदेसेनेच्या उमेदवारांनी घेतला आहे. सध्या सर्व उमेदवारांनी केंद्राबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले असून मतमोजणीची प्रक्रिया ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत.