मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी झाली, मग १४ तारखेला २२५ मतदान झाले कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:41 IST2026-01-17T13:39:56+5:302026-01-17T13:41:05+5:30
लेखी आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना उत्तरे देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी झाली, मग १४ तारखेला २२५ मतदान झाले कसे?
छत्रपती संभाजीनगर : झोन क्रमांक २ अंतर्गत १५, १६ आणि १७ प्रभागांची मतमोजणी सकाळपासून सुरळीत चालली होती. पण, शेवटच्या टप्प्यात प्रभाग १६ ‘ड’मधील मतमोजणीच्या वेळी, १४ तारखेला २२५ मतदान झाल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. यामुळे मतमोजणी कक्षात एकच हल्लकल्लोळ माजला. लेखी आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना उत्तरे देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता.
नेमके काय घडले?
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी १० वाजेपासून या तीनही प्रभागांची मतमोजणी सुरू झाली. दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रभाग १६ ‘ड’च्या मतमोजणी प्रसंगी एका ‘ईव्हीएम’मध्ये १४ जानेवारी रोजी झालेल्या २२५ मतदानावर उद्धवसेनेचे उमेदवार राजेंद्र दानवे व त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यानंतर उपस्थित अभय टाकसाळ व अन्य उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनीदेखील आक्षेप घेत उत्तर मागितले. त्यामुळे दोन तास मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. हा प्रकार पाहून सुरुवातीला मतमोजणी कर्मचारी व अधिकाऱ्यांना घामच फुटला. निवडणूक निर्णय अधिकारी निशेष अपार यांनी यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण कोणी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर पोलिस आयुक्त प्रवीण पवार व दंगाकाबू पथकाचे कमांडो मतमोजणी कक्षात दाखल झाले. त्यानंतर राजेंद्र दानवे यांच्यासह अन्य उमेवार त्यांच्या प्रतिनिधींनी ‘आमच्यावर दबाव टाकण्यासाठी पोलिस आयुक्तांना बोलावण्यात आले का’, असे म्हणत गोंधळ घातला. त्यावर ‘रुटीन’ भेट आहे, असे म्हणत पोलिसांना मतदान कक्षाच्या बाहेर जावे लागले.
हा तर ‘क्लॉक एरर’ ...
शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी राज्य निवडणूक आयोगास घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यावर उत्तर मिळाले की, हा प्रकार ‘क्लॉक एरर’ असल्यामुळे १५ तारखेला झालेले मतदान १४ मध्ये दाखविले गेले’. पण, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी ऐकायला तयार नव्हते. शेवटी या घटनेचा निषेध करीत उमेदवार मतमोजणी कक्षाच्या बाहेर निघून गेले आणि साडेचार- पावणेपाच वाजता निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला.
अधिकारी काय म्हणतात?
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी सांगितले की, उमेदवारांचा गैरसमज झाला. हा ‘क्लॉक एरर’ होता. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. दुसरीकडे, ‘ईव्हीएम’ बंद करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जातात. तपासणीमध्ये या बाबी समोर आल्या.