लग्नाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धर्मांतर करून केले लग्न, सिल्लोडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 20:38 IST2025-04-27T20:33:27+5:302025-04-27T20:38:54+5:30
लग्न लावणारा काझी, पती व सासरच्या पाच लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

लग्नाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धर्मांतर करून केले लग्न, सिल्लोडमधील घटना
श्यामकुमार पुरे,
सिल्लोड: मुलगीअल्पवयीन असतांना ( वय १४ वर्ष) तिच्यावर १ जानेवारी २०१९ पासून सतत सहावर्षे २६ एप्रिल २०२५ पर्यंत अत्याचार केले. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण केले. प्रकरण अंगलट येईल म्हणून ती सज्ञान झाल्यावर ३ एप्रिल २०२५ रोजी तिचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करून तिच्यासोबत लग्न केले अन् लग्नांनंतर बेदम मारहाण करून प्रताडीत करून अवघ्या २४ दिवसांतच सोडून दिले. ही घटना सिल्लोड शहरातील जैनोद्दीन कॉलनीत घडली.
याप्रकरणी सिल्लोडशहर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारवरून पोलिसांनी पीडितेची फसवणूक करणारे आरोपी पती सय्यदइम्रान सय्यदशौकत अतार(वय ३२ वर्षे) , फेरोज ( पूर्ण नाव माहीत नाही), पतीच्या भावाची पत्नी खुशबु, सय्यद इम्रानच्या ड्रायव्हरची पत्नी (नाव माहित नाही) सर्व रा. सिल्लोड व लग्न लावणारा काझी (रा.छत्रपती संभाजीनगर (नाव गाव माहीत नाही) या पाच लोकांविरुद्ध २६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.२४ वाजता बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व ॲक्ट्रॉसिटी, अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी सय्यद इम्रान याचे २०१९ पूर्वीच लग्न झालेले होते, त्याला पहिल्या पत्नी पासून चार मुलं आहेत. त्यानंतर त्याने सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला १ जानेवारी २०१९ रोजी लग्नाचे आमिष दाखवून दहिगाव येथे व सिल्लोड शहरातील जैनोद्दीन कॉलनीत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले व नंतर तिला तिच्या भावाला जिवाने मारून टाकील अशी धमकी देऊन व लग्नाचे अमिश दाखवून सतत सहा वर्षे अत्याचार केले.
तिचे अश्लील फोटो व व्हीडीओ रेकॉडींग करून घेतले, तिला ब्लॅकमेलही केले. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याने तिने तक्रार केली तर हे प्रकरण आपल्या अंगलट येईल म्हणून विश्वासात घेऊन ३ एप्रिल २०२५ रोजी एका काझीकडून १०० रुपयांच्या बॉण्डवर तिचे धर्मांतर केले. तसेच, तीन लोकांच्या उपस्थितीत मुस्लिम रीती रिवाज नुसार छत्रपती संभाजीनगर येथे तिच्या सोबत (ती १९ वर्षाची झाल्यावर ३ एप्रिल रोजी लग्न लावले.) लग्न लागल्यावर त्याने त्याचा खरा रूप दाखवला. लग्नानंतर तिला बेदम मारहाण करून प्रताडीत करून वाऱ्यावर सोडून दिले. आता तुला कुठे जायचे जा काय करायचे कर असे म्हणून धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून तिने सिल्लोड शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे करीत आहेत.