'पैशाच्या जोरावर सत्तेचे शहाणपण हरले!' पराभवानंतर अंबादास दानवेंचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:57 IST2026-01-16T19:53:31+5:302026-01-16T19:57:22+5:30
भाजपच्या आकाशातून धो-धो पैशाचा पाऊस पडला! पराभवानंतर अंबादास दानवेंचा सणसणीत आरोप.

'पैशाच्या जोरावर सत्तेचे शहाणपण हरले!' पराभवानंतर अंबादास दानवेंचा भाजपवर घणाघात
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याची प्रांजळ कबुली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. "पराभव मान्य केलाच पाहिजे, मात्र हा पराभव जनतेच्या कौलापेक्षा सत्तेच्या आणि पैशाच्या वापराचा अधिक आहे," असा गंभीर आरोप दानवे यांनी यावेळी केला.
'धो-धो' पैशाचा पाऊस आणि ईव्हीएमचा घोळ
पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले की, "आम्ही प्रचार अत्यंत प्रामाणिकपणे केला होता, मात्र भाजपने पैशाचा नंगा नाच केला. भाजपच्या आकाशातून अक्षरशः पैशाची वृष्टी झाली. तसेच मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला काही ठिकाणी ईव्हीएम रिसेट झाल्याच्या आणि २५ टक्के मतदानाच्या संशयास्पद घटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत." शहराला भाजपने पाणी दिले नाही, तरीही जनतेने त्यांना निवडून दिले, यावर त्यांनी "जनतेच्या मनात काही असेल तर शुभेच्छा" अशा शब्दांत टोला लगावला.
शिंदेसेनेच्या स्थितीवर टीका
शिवसेनेच्या फुटीनंतरचा हा मोठा सामना होता. यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, "आम्ही आणि शिंदेंची शिवसेना दोघांचेही हे दुर्दैव आहे. त्यांच्याकडे सत्तेची सर्व साधने उपलब्ध असताना ते केवळ ११-१२ जागांपर्यंत पोहोचू शकले. भाजपने आम्हाला तर संपवायचे ठरवलेच होते, पण त्यांच्यासोबत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना तरी त्यांनी संपवायला नको होते."
७० जागांचा दिला दाखला
आमचे सात उमेदवार निवडून आले असून ३५ ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहोत, असे दानवे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता महाविकास आघाडीच्या रूपाने निवडून आलेले ७० प्रतिनिधी आगामी काळात मुंबईच्या राजकारणाला नवी दिशा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आता आम्ही खचून न जाता, अधिक जोमाने कामाला लागू आणि जनतेचे प्रश्न मांडत राहू," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.