छत्रपती संभाजीनगरसह राज्यात एमआयएमचा 'ग्रँड' विजय!; इम्तियाज जलील म्हणाले, 'भाजपला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:31 IST2026-01-16T19:26:08+5:302026-01-16T19:31:48+5:30
"भाजपनेच शिंदेसेनेला संपवलं" इम्तियाज जलील यांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगरसह राज्यात एमआयएमचा 'ग्रँड' विजय!; इम्तियाज जलील म्हणाले, 'भाजपला...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने ३३ जागा जिंकून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निकालाने शहराच्या राजकारणाची सर्व समीकरणे मोडीत काढली आहेत. विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपवर कडाडून टीका केली, तर शिंदेसेनेच्या पराभवावर खोचक भाष्य केले.
"भाजपला शिंदेसेना संपवायची होती"
इम्तियाज जलील यांनी भाजपच्या रणनीतीवर मोठा दावा केला. "भाजपकडे ताकद आणि सत्ता होती. त्यांना शिंदेसेना संपवायची होती, म्हणूनच ते ऐनवेळी एकटे लढले आणि त्यांचे हे ध्येय यशस्वी झाले," असे जलील म्हणाले. शिंदेसेनेकडे मंत्री, खासदार आणि सहा आमदार असूनही त्यांना यश मिळाले नाही, आता ते आमच्या मागे फेकले गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
जातीयवादाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर
"आमच्यावर नेहमी जातीयवादाचा आरोप केला जातो, पण आज आम्ही दलित, हिंदू आणि आदिवासी उमेदवारांना निवडून आणून दाखवले आहे. आम्ही केवळ एका समुदायाचे पक्ष नाही, हे या निकालाने सिद्ध केले आहे," असे जलील यांनी ठामपणे सांगितले. एमआयएम आता महापालिकेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागत असतील, तर भाजपला समर्थन देण्याचा विचार करू, असे सूतोवाचही त्यांनी केले.
ओवीसींना दिलेल्या शब्दाची पूर्तता
मागच्या वेळी एमआयएमचे २५ नगरसेवक होते. "मी असदुद्दीन ओवीसी यांना २८ जागांचा शब्द दिला होता, पण जनतेने आम्हाला ३३ जागा देऊन मोठा आशीर्वाद दिला आहे. हैदराबाद नंतर आता देशात छत्रपती संभाजीनगरने एमआयएमला आपले मानले आहे," अशा शब्दांत जलील यांनी जनतेचे आभार मानले.
छत्रपती संभाजी नगर अंतिम निकाल: ११५
भाजप : ५८
एमआयएम : ३३
शिंदेसेना: १२
उद्धवसेना: ६
वंचित बहुजन आघाडी: ४
काँग्रेस : १
राष्ट्रवादी शप : १
राष्ट्रवादी अप: 0