छत्रपती संभाजीनगराला मुबलक पाणी देण्याचा शब्द भाजपच पूर्ण करणार: मंत्री अतुल सावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:21 IST2026-01-13T15:21:07+5:302026-01-13T15:21:26+5:30
केंद्र व राज्यातील याेजनांचा थेट लाभ मिळेल

छत्रपती संभाजीनगराला मुबलक पाणी देण्याचा शब्द भाजपच पूर्ण करणार: मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर : शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शब्द भाजपने दिला आहे. तो आम्ही पूर्ण करणार, असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सोमवारी नमूद केले.
भाजपने संकल्प, विकसित, संरक्षित स्वच्छ व रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगरचा जाहीरनामा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांसमोर ठेवला आहे. त्यामुळे भाजपने शहर विकासाचे व्हिजन मांडले आहे, भाजपचा महापौरच मतदार पालिकेत बसवतील, हा ठाम विश्वास असल्याचे मंत्री सावे यांनी नमूद केले. केंद्र व राज्यातील योजनांचा थेट लाभ या शहराला केव्हा मिळू शकेल. जेव्हा महापालिकेत भाजपचा महापौर बसेल. केंद्र, राज्यातील सत्ता आणि शहरातही त्याचा विचारांची ताकद असेल तर विकासाला तिप्पट गती मिळेल. त्यामुळे लोकसभा, विधानसभेला जसे मतदारांनी विजयी केले, त्यानुसारच पालिकेतदेखील आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील, ही खात्री असल्याचा दावा मंत्री सावे यांनी केला.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून लवकरच पाणी
शहराला आगामी २५ वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून २०१९ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. अडीच वर्ष योजनेला आघाडी सरकारने ब्रेक लावला. सध्या २,७४० कोटींतून योजनेचे काम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. मोदी सरकारने अमृत-२ याेजनेतून १ हजार कोटींचा निधी दिला आहे. येत्या काही महिन्यांत घरोघरी दररोज नळाला पाणीपुरवठा होईल. हे आश्वासन नसून सत्य आहे.मनपाचा १० टक्के वाटाही शासनाने उचलला आहे. बाकी रक्कम बिनव्याजी कर्जाने देण्यात आली आहे.
आधी केले मग सांगितले....
केंद्र व राज्यातील सत्तेचा फायदा या शहराला औद्याेगिक गुंतवणुकीच्या रूपाने झाला आहे. नुसत्या थापा मारण्याऐवजी प्रत्यक्षात ५३ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. जगभरातील बड्या कंपन्या येथे येणार असल्यामुळे २५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. ईव्ही हब म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. त्यामुळे रेल्वे, विमान, रोड कनेक्टीव्हीटी, रिंगरोड, शहरातील प्रमुख रस्ते, भुयारी मार्ग, वाहतुक नगरी, सीएसएमआरडीएचे नियोजन, आरोग्य, शिक्षण, पर्यटनासह अखंड उड्डाणपूल बांधणे ही कामे अजेंड्यावर आहेत, असे मंत्री सावे यांनी सांगितले.