शेतकऱ्यांनो सावधान; बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून मापात घोळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:06 IST2024-12-06T15:02:52+5:302024-12-06T15:06:26+5:30
बाजारात शेतकऱ्यांची लूट : बाजार समितीने करावी चौकशी

Farmers beware; In the market committee, there is fraud in the measurements from the traders!
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यात सद्य:स्थितीत शेतकऱ्यांची धान पिकांची मळणी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे मळणी करून धान विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या दरापेक्षा जास्त दराने खरेदीचे आमिष दाखवत वजनकाट्यातून सर्रास लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.
बहुतांश शेतकरी पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री करायचे. मात्र, या ठिकाणी चुकारा पैसे मिळण्यास वेळ लागतो व गावात व्यापारी जास्त दर देऊन नगदी पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बांधावरच विक्री करण्यात वाढला आहे. शेतकरी धान पीक लागवडीपूर्वी बँकांचे कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज वेळप्रसंगी हातउसने पैसे घेऊन शेती पिकवितो. मात्र, घेतलेल्या कर्जाचे देणे घेणे करण्याकरिता धान हातात आल्याबरोबर शेतकऱ्यांना पैसे हवे असतात. त्यामुळे धानाची मळणी झाल्याबरोबर धान पीक शेतकरी लगबगीने विकतो. याचाच फायदा व्यापारी घेत असल्याची ओरड आहे.
चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो ?
व्यापारी गावात फिरून किंवा मळणी झाल्याबरोबर लगेच शेतातच येतात. तिथेच शेतकरी व्यापाऱ्याला धान विक्री करीत आहेत. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांनी मूल येथील बाजारपेठेपेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे जास्त दर देऊन खरेदी सुरू केली आहे. मूलला नेऊन राईस मिलला हे धान विक्री करतात. असे असले तरी जास्तीचा दर व मूलपर्यंतचे भाडे क्चिटलमागे जवळपास ६० रुपये हा खर्च कुठून काढत असतील. तोट्यात तर व्यवसाय करणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मापातच पाप आहे, असा आरोप सुज्ञ शेतकयांनी केला आहे.
इलेक्ट्रिक काट्यात सेटिंग?
वाहतुकीसाठी सोईस्कर व्हावे म्हणून अनेक व्यापारी इलेक्ट्रिक काट्यांनी धान खरेदी करतात. मात्र, या काट्यामध्ये तीन ते पाच किलोंची सेटिंग होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.
"धान मळणी सुरू असून कर्जाचे देणेघेणे असल्याने मळणी झाल्याबरोबरच धान विक्री करावी लागत आहे. गावातच बांधावर शेतकरी धान विकणे पसंत करीत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून वजनमापात बदल करीत आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वजन काट्यांची चौकशी करावी."
- भीमराव डोर्लीकर, शेतकरी गडसुर्ला.
"दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दोन व्यापाऱ्यांचे वजन काटे जप्त केले होते. अधिक नफा कमविण्याच्या लालसेने असे प्रकार घडतात. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल."
- अजय गंटावर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मूल.