रब्बी पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार पीकविमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:36 IST2024-11-05T14:34:35+5:302024-11-05T14:36:36+5:30
१ नोव्हेंबरपासून सुरुवात : ऑनलाइन सुविधा उपलब्ध

Crop insurance can be paid till December 15 for rabi crops
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने जून-२०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यांसाठी पीकविमा भरता येणार आहे.
राज्य शासनाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना प्रति एक रुपया याप्रमाणे पीकविमा योजनेस सुरुवात केली आहे. नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत मदत मिळू शकेल. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीकविमा काढून घेणे फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर पीकविमा अर्ज व्यवस्थित भरावा, यामुळे अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे.
सीएससीवर अर्ज करा
रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर जाऊन शेतकरी पीकविमा अर्ज भरू शकतात. बँका, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत ही पीकविमा अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
७० टक्के जोखीम स्तर केला आहे निश्चित
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया देऊन विमा भरला होता. शेतकऱ्यांचा प्रीमियम केंद्र व राज्य शासनाने पीकविमा कंपनीला दिला आहे. त्यामुळे अग्रीमची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बीत देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी लागू राहणार आहे.