Stock Market Crash : आज(दि.३०) आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारदिनी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसभर दबावाखाली राहिलेल्या बाजारात शेवटच्या तासात काहीशी सावरलेली स्थिती दिसली, मात्र तोटा भरून निघू शकला नाही. BSE Sensex ५८२ अंकांनी घसरून ७७,००० च्या खाली ७६,९१३ वर बंद झाला, तर Nifty 50 १८० अंकांनी घसरून २४,००० च्या खाली २३,९९७ वर स्थिरावला.
दिवसाची सुरुवातच घसरणीसह झाली होती. सेन्सेक्स ७७,४९६ वरून घसरत ७७,०१४ वर उघडला आणि व्यवहारादरम्यान तब्बल १,२३८ अंकांनी कोसळून ७६,२५८ पर्यंत खाली आला. शेवटच्या तासात काहीशी रिकव्हरी झाली, तरीही तो मोठ्या घसरणीसहच बंद झाला. निफ्टीच्याही बाबतीत समान चित्र दिसले. तो २४,१७७ वरून घसरून २३,९९६ वर उघडला आणि व्यवहारादरम्यान २३,७९६ पर्यंत खाली गेला. या घसरणीत अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले.
बाजारातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत होत्या. विशेषतः अमेरिका-इराण संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी कायम ठेवण्याचा संकेत दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली. ब्रेंट ग्रुड ऑईल १२४ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याने बाजारावर दबाव आला.
याच तणावाचा परिणाम आशियाई बाजारांवरही झाला, ज्याचे नकारात्मक संकेत भारतीय बाजारात दिसून आले. त्यातच भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरला. रुपया ९५.२३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी डळमळीत झाला. Eternal, Hindustan Unilever, Tata Steel आणि Larsen & Toubro सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
