नवी दिल्ली : देशातील नोकरीच्या बाजारपेठेत चालू आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली असून, एप्रिल महिन्यात नोकरभरतीमध्ये वार्षिक सहा टक्क्यांची वाढ नोंदविॉण्यात आली आहे. ‘नोकरी जॉबस्पीक इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, विमा क्षेत्रातील नियुक्त्यांमध्ये तब्बल २१ टक्क्यांची वाढ झाल्याने हे क्षेत्र रोजगाराच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. मात्र, महानगरांच्या तुलनेत मुंबईत भरती प्रक्रियेत तीन टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक भरती ही हैदराबाद, बेंगळुरू येथे झाली आहे.
क्षेत्र वाढ/घट
विमा २१%
बीपीओ/आयटीईएस १५%
रिअल इस्टेट १२%
आरोग्य सेवा ११%
शिक्षण ९%
दूरसंचार -११%
बँकिंग -१०%
विमा आणि रिअल इस्टेटमध्ये ‘बूम’
अहवालानुसार, विमा क्षेत्रानंतर बीपीओ (१५%), रिअल इस्टेट (१२%), आरोग्य सेवा (११%) आणि शिक्षण (९%) या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
टेलिकॉम आणि बँकिंग क्षेत्रात घसरण कायम आहे. आयटी, वाहन क्षेत्रातील स्थिती स्थिर राहिली आहे.
छोट्या शहरांकडे कल : मोठ्या महानगरांपेक्षा जयपूर (१२%), कोईम्बतूर (११%) व अहमदाबाद (७%) यांसारख्या टियर-२ शहरांमध्ये कंपन्यांनी नोकरभरतीवर अधिक भर दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
