मुंबई : भारतीय ग्राहक आता निराशेच्या गर्तेतून बाहेर येत असून ऑगस्टपासून त्यांनी खर्चाबाबत हात ढिला सोडल्याचे दिसून येत आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सप्टेंबर महिन्यातील सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यापासून लोकांची भावना बदलली असल्याचे आढळून आले आहे. लोकांच्या मनात अर्थव्यवस्थेबद्दल असलेली निराशा कमी झाली आहे. तसेच खर्चाबाबतही लोक अधिक आशावादी झाले आहेत. अर्थव्यवस्था, रोजगार आणि उत्पन्न याबाबतही लोकांच्या मनातील आशावाद वाढला आहे. वस्तूंच्या किमतींबद्दल मात्र ते अजूनही चिंतेत आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, कोविड-१९ साथीमुळे लोकांच्या मनात अर्थव्यवस्था आणि तिच्याशी संबंधित अनेक घटकांबद्दल निराशा होती. साथीचा विळखा आता कमी झाला आहे. तसेच निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील आशाही पल्लवित झाल्या आहेत. भविष्याविषयीच्या अपेक्षांच्या बाबतीत सर्वाधिक आशावाद निर्माण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. चालू परिस्थितीत निर्देशांक मे २०२० पासूनच्या काळातील सर्वाेच्च पातळीवर आला आहे, तसेच भविष्यकालीन निर्देशांक नोव्हेंबर २०२० पासूनच्या काळातील सर्वोच्च पातळीवर आला आहे.