लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेल व वायू पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याचा थेट फटका आशियाई देशांच्या ऊर्जा व्यवस्थेला बसू लागला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश पुन्हा कोळशाकडे वळत आहेत.
एलएनजी (द्रवरूप नैसर्गिक वायू) पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे वीजनिर्मितीसाठी कोळसा पर्याय बनत आहे. एलएनजी पुरवठ्यात घट झाल्याने भारत, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देश कोळशावर अवलंबून राहू लागले आहेत.
भारताची गरज वाढली
भारतात यंदा कडक उन्हाळा असून, विजेची मागणी २७० गिगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोळशाचा वापर वाढला आहे. सध्या तरी भारताकडे सुमारे तीन महिने पुरेल इतका कोळशाचा साठा उपलब्ध आहे. एलएनजीचा तुटवडा असल्याने, उपलब्ध वायूचा वापर वीज निर्मितीऐवजी खत कारखान्यांकडे वळवण्यात येत आहे.
दरवाढ आणि पुरवठा अनिश्चिततेचा फटका
ऑस्ट्रेलियातील ‘कोळसा’ दरात युद्धानंतर सुमारे १३% वाढ झाली आहे. इंडोनेशियाकडून निर्यात कमी झाल्यास प्रादेशिक पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. यामुळे वीज दर वाढण्याची शक्यता असून, आयात करणाऱ्या देशांसाठी आर्थिक भार वाढणार आहे.
आशियात कोळशाचा ‘रिव्हर्स गीअर’
दक्षिण कोरियाने कोळशावर आधारित वीजनिर्मितीवरील निर्बंध शिथिल केले आहेत, तर इंडोनेशियाने निर्यातीपेक्षा देशांतर्गत वापराला प्राधान्य दिले आहे. चीनने ऊर्जा सुरक्षेसाठी कोळसा उत्पादन वाढवले आहे. परिणामी, संपूर्ण आशियात कोळशाचा वापर पुन्हा वाढत आहे.
कोळसा वापराने पर्यावरणीय धोका अधिक तीव्र
कोळशाच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सूक्ष्म कण वाढून हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार व कर्करोगाचा धोका वाढतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. भारतासारख्या देशांमध्ये आधीच प्रदूषणाची पातळी धोकादायक असल्याने ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
