नवी दिल्ली : सप्टेंबर २०२१ मध्ये १६,५७० नवीन कंपन्यांची नोंदणी करण्यात आली असून देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या आता १४.१४ लाख झाली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी देशात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांची संख्या २२,३२,६९९ होती.
तथापि, त्यातील ७,७३,०७० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या नियमानुसार, २,२९८ कंपन्या निष्क्रिय आहेत. ६,९४४ कंपन्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत, तसेच ३६,११० कंपन्या बंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ३० सप्टेंबर २०२१ रोजी एकूण १४,१४,२७७ कंपन्या सक्रिय होत्या.
मंत्रालयाने म्हटले की, सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या काळातील आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, एप्रिल २०२० मध्ये कंपन्यांची मासिक नोंदणी नीचांकावर गेली होती. त्यानंतर ती पुन्हा वाढत गेली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये १६,५७० नव्या कंपन्यांची नोंदणी करण्यात आली. सप्टेंबर २०२० मध्ये १६,६४१ कंपन्यांची नोंदणी झाली होती. आदल्या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये कंपन्यांच्या नोंदणीत २४.६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ४,५३५ एलएलपींची नोंदणी झाली. सप्टेंबर २०२० मध्ये ४,०१६ एलएलपींची नोंदणी झाली होती.
३०७ कंपन्या अनलिमिटेड
१४,१४,२७७ सक्रिय कंपन्यांपैकी १४,०५,०९८ कंपन्या समभागांच्या दृष्टीने लिमिटेड आहेत. ८८७२ कंपन्या हमीच्या दृष्टीने लिमिटेड आहेत. ३०७ कंपन्या अनलिमिटेड आहेत.