पैशाअभावी उपचार थांबले, आशा संपली; गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:38 IST2025-06-25T15:37:50+5:302025-06-25T15:38:47+5:30
Bhandara : पोल्ट्री फार्मचे कर्ज थकल्याने तरुणाने संपविले जीवन

Treatment stopped due to lack of money; Farmer commits suicide by hanging
लोकमत न्यूज नेटवर्क
गोबरवाही/लाखांदूर : जिल्ह्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चिखली (ता. तुमसर) येथील तरुणाने पोल्ट्री फार्मचे कर्ज थकल्याने जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत राजनी (ता.लाखांदूर) येथील शेतकऱ्याने कर्ज आणि आजारापणाला कंटाळून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमध्ये गळफास हे साम्य आहे.
लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील लक्ष्मण नामदेव ठाकरे (५८) या शेतकऱ्याला एका असाध्य आजाराने ग्रासले. या आजारावर औषधोपचार करण्यासाठी कुटुंबीयांनी गावातील बचत गटासह काही नातलगांकडून हात उसने पैसे घेतले होते. मात्र, आजार बरा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पत्नी, मुलगा, सून व नातवंडांसह एकत्रित कुटुंबाने राजनी येथे राहत होता. औषधोपचार करूनही आजार बरा होत नसल्याने ते चिंतेत होते. डॉक्टरांनी पुन्हा उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने पुन्हा खर्च लागणार होता. मात्र, आता तेवढी ऐपत नसल्याने ते अधिकच खचले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास पत्नी व सून शेतावर गेले होते, नातवंड शाळेत तर मुलगा सेंट्रिंगच्या कामावर गेला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून लक्ष्मण यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.