२०२५ मध्ये शिक्षकांना ७६ सुट्ट्या मात्र प्रत्यक्षात मिळणार ९२ सुट्ट्यांची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:29 IST2025-01-21T13:28:21+5:302025-01-21T13:29:20+5:30
Bhandara : ९२ सुट्ट्यांची पर्वणीच. त्यामुळे शिक्षक कर्मचान्यांची मजाच

In 2025, teachers will get 76 holidays, but will actually get 92.
राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी :शिक्षक कर्मचाऱ्यांना किती सुट्टधा मिळतील याबाबतची उत्सुकता लागली होती. विद्यार्थ्यांपासून तर शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष सुट्टधांच्या यादीकडे लागून राहिले होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना २०२५-२०२६ या वर्षातील रेकार्डवर ७६ सुट्ट्या आहेत. प्रत्यक्षात मात्र ९२ सुट्टयांची पर्वणीच प्राप्त झाली आहे.
नवीन वर्ष सुरू झाले. नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची प्रतीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांना लागली होती. नवीन वर्षातील सुट्ट्यांबाबत मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे यांच्या कक्षात शुक्रवारी घेण्यात आली. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून २०२५ या वर्षातील सुट्ट्या ठरविण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टया १७ मे ते २५ जूनपर्यंत राहणार आहेत. २६ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. नियोजित सुट्ट्याच्या व्यतिरिक्त रविवार व सुट्ट्यांचे दिवस सोडण्यात आले आहेत. उन्हाळ्यात ७ सुट्टया अधिक मिळणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत. १ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. दिवाळीच्या सुद्धा रविवार व अन्य सुट्टया वगळून ५ सुट्टया अधिक मिळणार आहेत. कर्मचारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहितीही शिक्षण वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
सार्वजनिक सुट्टया २४ आहेत; परंतु प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी, मोहर्रम, गणेश चतुर्थी हे सण रविवारी येत आहेत. नियोजित सार्वजनिक सुट्टया २० ठरविण्यात आल्या आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ७६ सुट्टया ठरवून दिल्या आहेत. रविवार व अन्य सण वगळून शिक्षक कर्मचाऱ्यांना एकूण ९२ सुट्टया मिळणार आहेत. १६ सुट्ट्यांच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.
२३० असावे शाळेच्या कामकाजाचे दिवस
मंजूर करण्यात आलेल्या सुट्ट्यांचे पालन प्रत्येक शाळांना करायची आहे. शाळेचे कामकाज किमान २३० दिवस राहील याची दक्षता मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे, हे येथे महत्वाचे.
३ मार्चपासून होणार सकाळपाळीत शाळा
फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या शिक्षण मंडळाची परीक्षा होणार आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असतो, तसेच शिक्षकांना परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करायला जावे लागते. यामुळे ३ मार्चपासून सकाळपाळीत शाळा भरणार आहेत.