शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:08 IST2025-05-30T13:07:40+5:302025-05-30T13:08:26+5:30
कृषी केंद्रावर अवलंबून राहू नये : शेतकरी संघटनेचे आवाहन

Farmers should use home-grown seeds for sowing and focus on organic fertilizers.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांनी वाढलेली फसवणूक व लुबाडणूक टाळण्यासाठी कृषी केंद्रांवर अवलंबून राहू नये. घरीच बीज प्रक्रिया करून निर्जंतुक बियाणे पेरणीसाठी तयार करावे. महागड्या रासायनिक खतांचा वापर मर्यादित करावा. स्वतःच बी-बियाणे तयार करून साठवणूक करावी. जैविक खते, गांडूळ खत, सोनखत आदींचा वापर करावा, असा सल्ला राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी अभय रंगारी यांनी दिला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित कृषी केंद्रात रासायनिक खताची शेतकऱ्यांना विक्री करून १६ लाख ४२ हजारांनी फसवूणक करण्यात आली. तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तपासणीत १२९.२५ मेट्रिक टन बोगस खताचा साठा जप्त करण्यात आला. हंगामात बोगस बी-बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी तसेच बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बियाण्यांसंबंधी वाढल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी
दरवर्षी बियाणे, खतांसंबंधीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शेतकरी कर्ज घेऊन पिकांची लागवड करतो. मात्र, कृषी केंद्रातील बियाणे पेरणी केल्यानंतर अनेकदा उगवतच नाही. उगवले तर भेसळीचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस पीक वेळेत कापणीला येत नसल्याने नुकसान होते.
...तर कृषी केंद्रांवर व्हावी कठोर कारवाई
खरीप हंगामात फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच तपासणी करून बोगस बियाणे व खताला आळा घालण्यासाठी कठोर तपासणी व कारवाई करावी, प्रसंगी कृषी केंद्र निलंबीत करावे, अशी मागणीही शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
अन्य राज्यांतून बोगस खते, बियाणे विक्रीची शक्यता
- खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने लवकरच पेरणीसाठी शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी कृषी केंद्रात धाव घेणार आहेत. मात्र, त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा प्रसंगी अनेक कृषी केंद्र चालक घेतात. शेतकऱ्यांची फसवणूक करतात.
- अधिक नफा कमविण्यासाठी बोगस खत कंपन्या, वितरक यांच्याशी संगनमत करून कृषी केंद्र चालक राज्यात परवाना नसलेल्या बी-बियाणे, रासायनिक खते विक्रीस आणू शकतात. राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातून बोगस खत व बियाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"कृषी विभागाने बी-बियाणे व खतांचा तपासणी अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावण्यासाठी केंद्राला बंधनकारक करायला पाहिजे. तसेच भरारी पथकांनी कितीदा तपासणी केली, किती नमुने गोळा केले, प्रयोगशाळेत पाठविले, याचाही अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावावा."
- अभय रंगारी, जिल्हा प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा.