२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:00 IST2025-05-26T09:57:53+5:302025-05-26T10:00:39+5:30

Jagannath Rath Yatra 2025 Date: जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. जगन्नाथ रथयात्रा नेमकी कधीपासून सुरू होणार? या रथयात्रेचे महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

when will the puri jagannath rath yatra start in 2025 know about date and some the amazing features significance in marathi | २०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये

२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये

Jagannath Rath Yatra 2025 Dates: भारतात हजारो मंदिरे आहेत. यातील शेकडो मंदिरांना महान परंपरा लाभलेल्या आहेत. भारतात संस्कृती आणि परंपरांना मोठे महत्त्व दिले जाते. देशभरातील मंदिरांमध्ये जत्रोत्सव, यात्रोत्सव, वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात तसेच अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात. भारतात अनेक मंदिरे अशी आहेत की, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भूत उत्सवांमध्ये केवळ स्थानिक नाही, तर देश-परदेशातून भाविक आवर्जून उपस्थिती लावत असतात. यापैकी एक म्हणजे ओडिसा पुरी येथील जगन्नाथ मंदिर. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा अद्भूत परंपरा आणि समृद्ध संस्कृतीचा एक सर्वोत्तम आदर्श असल्याचे मानले जाते. यंदा २०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधी आहे? महत्त्व, महात्म्य आणि मान्यता जाणून घेऊया...

भारतातील अनेक मंदिरे जगातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी आहेत. दरवर्षी कोट्यवधी भाविक, पर्यटक या मंदिरांना भेटी देत असतात. ओडिशातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर त्यापैकीच एक आहे. जन्ननाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून, देश-विदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात. जगन्नाथ पुरी मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत, असे सांगितले जाते. 

२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू?

भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात, अशी मान्यता आहे. या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान ८ लाख भाविक सहभागी होत असतात. यंदा २०२५ मध्ये शुक्रवार, २७ जून रोजी जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे १४४ वर्षे बंद होते.हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. 

अनेक महिने आधीपासून सुरू होते तयारी

जगन्नाथ रथयात्रेचे प्रमुख आकर्षण असते ते या यात्रेतील रथ. प्रत्येक वर्षी रथ घडवण्याची सुरुवात काही महिने आधीपासून होते. तसेच या रथयात्रेसंदर्भातील तयारीही अनेक महिने आधीपासून सुरू होते. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते, असे सांगितले जाते. जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. बलराम आणि सुभद्रा यांचा रथ लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथांचा रथ पिवळ्या किंवा लाल रंगाने सजवला जातो. रथ सुशोभित करण्यात पारंपारिक कारागिरांचे विशेष योगदान आहे. हे काम पूर्ण भक्तिभावाने आणि विधीनुसार केले जाते.

दरम्यान, भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने आणि रथ ओढल्याने माणसाला सौभाग्य प्राप्त होते. रथयात्रेत सहभागी झाल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक पुरीला येतात.

 

Web Title: when will the puri jagannath rath yatra start in 2025 know about date and some the amazing features significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.